वाचा:
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. फडणवीस यांनी यावेळी केंद्रीय अर्थसंकल्पात आणि रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदींचा पाढाचा वाचला. ‘केंद्रीय अर्थसंकल्पाचा नीट अभ्यास न करताच या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आले नाही, अशा पद्धतीचा प्रचार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुरू केला आहे. राज्यातील रस्ते, रेल्वे, सिंचन, मेट्रो या पायाभूत क्षेत्रांसाठी तसेच अन्य प्रकल्पांसाठी मंजूर झालेले प्रकल्प व मंजूर प्रकल्पांसाठी झालेल्या तरतुदी पाहता महाराष्ट्राच्या वाट्याला ३ लाख ५ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील १० हजार किलोमीटर लांबीच्या ३२८ रस्ते प्रकल्पांसाठी १ लाख ३३ हजार २५५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यासाठी २ हजार किलोमीटर लांबीचे १६ नवे रेल्वे मार्ग मंजूर झाले आहेत. जलशक्ती मंत्रालयाकडून राज्यासाठी ४ हजार कोटींची तरतूद केली गेली आहे,’ असं फडणवीस म्हणाले.
वाचा:
मुंबईच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या दमणगंगा पिंजार प्रकल्पासाठी ३ हजार कोटी, घरोघरी नळाने पाणी देण्याच्या योजनेसाठी १ हजार १३३ कोटी तसेच विदर्भ, मराठवाडा व उर्वरीत महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्ह्यांसाठीच्या योजनांकरीता अनुदानापोटी १२०० कोटी देण्यात आले आहेत. रेल्वेने महाराष्ट्रासाठी ७ हजार १०७ कोटींची तरतूद केली आहे. २००९ ते २०१४ या पाच वर्षांत महाराष्ट्रासाठी रेल्वेने अवघे १ हजार कोटी दिले होते, त्या तुलनेत यावेळी एकाच वर्षी ७ हजार कोटी रुपये दिले आहेत, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं.
वाचा:
‘मुंबईतील मेट्रो- ३ साठी १ हजार ८३२ कोटी, पुणे मेट्रोसाठी ३ हजार १९५ कोटी, नागपूर मेट्रो टप्पा दोन साठी ५ हजार ९७६ कोटी, नाशिक मेट्रोसाठी २ हजार ९२ कोटी अशी तरतूद केली गेली आहे. आता राज्य सरकारने या प्रकल्पांत खीळ न घालता ते वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times