राज्यपाल कोश्यारी आज उत्तराखंड दौऱ्यावर असून यावेळी ते सरकारच्या विमानानं जाणार होते. मात्र, त्यांना प्रवासाची परवानगी नसल्यानं विमानातून उतरावं लागलं असल्याचं वृत्त होतं, यावरुन भाजपनं या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सरकारवर टीकेची तोफ डागली असून विविध मुद्द्यावरुन सरकारला घेरलं आहे.
‘राज्यपालांना विमानाने प्रवास करायचा असल्यास साधारणतः याबाबतची फाइल मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली जाते. ती मुख्यमंत्री कार्यालयाकडून मान्य केली जाते. मात्र, या सरकारमुळे राज्यपालांना शासकीय विमानातून उतरून खासगी विमानाने कार्यक्रमाला जावे लागले. हे सुडाचे आणि द्वेषाचे राजकारण आहे,’ अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
‘राज्य सरकारने काही लोकप्रतिनिधींची सुरक्षा व्यवस्था काढून टाकली आहे. राज्यपालांना शासकीय विमानाने प्रवास करण्यासाठी परवानगी नाकारली. पुण्यातील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी ४८ तास उलटून गेले ,तरी गुन्हा दाखल न होणे यावरून राज्य सरकार ‘हम करे सो कायदा’ असे वागत आहे. आम्हाला जे हवं ते आम्ही करणार. लोकांनी आम्हाला सरकार चालवण्यासाठी निवडून दिलेले नाही. त्यामुळे आम्ही लोकांना उत्तर देण्यास बांधिल नाही, असे या सरकारचे धोरण आहे,’ असा आरोपही त्यांनी केला आहे.
वाचाः
‘भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांनी देशाच्या हिताचे ट्वीट केले. त्यांना व्यक्तिस्वतंत्र्य नाही का? या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र पुण्यात एका माजी मंत्र्यांशी प्रेमसंबंध असल्यावरून एका तरुणीने आत्महत्या केली आहे. याबाबत गुन्हा दाखल केलेला नाही. त्या तरुणीच्या नातेवाईकांनी तक्रार दिली नसल्याचे पोलिस सांगत आहे; पण सू मोटो गुन्हा दाखल करता येत नाही का’, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे.
मनसेसोबत युती?
आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप मनसेसोबत युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे. ‘अमराठी नको, ही भूमिका त्यांनी बदलावी, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. तसंच, मनसेने ही भूमिका सोडली तर मनसेबरोबर युती होऊ शकते, असे मी यापूर्वी म्हटले होते. मात्र, मनसेच्या एका नेत्याने आम्ही तुम्हाला विचारायला आलो का, असे वक्तव्य केले होतं, अशी आठवणही त्यांनी करुन दिली आहे. तसंच, प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे. मनसेमध्ये अमराठी बांधव आले, तर चांगली गोष्ट आहे. त्यांच्या हिंदुत्वाबाबत शंका नाही, अमराठी नको, ही भूमिका त्यांनी बदलावी असे आमचे म्हणणे आहे,’ असं त्यांनी स्पष्टक केलं आहे.
वाचाः
‘शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुजराती आणि अमराठी बांधवांविषयीचे प्रेम हे पुतना मावशीच्या प्रेमासारखे आहे. महापालिकांच्या निवडणुका जवळ आल्या असल्याने त्यांना ही मते हवी आहेत,’ अशी जहरी टीकाही त्यांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times