मुंबईः करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचं अवाहन शिवप्रेमींना केलं होतं. तसंच, यासाठी नियमावलीही जारी करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीवर भाजपनं आक्षेप घेतला असून सरकारवर टीका केली होती. त्यानंतर, सरकारकडून शिवजयंतीच्या नियमांत बदल करण्यात आले आहेत.

गुरुवारी राज्य सरकारकडून शिवजयंतीसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रभात फेरी, बाइक रॅली मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, तसंच, सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करुन १० जणांच्या उपस्थित शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली होती. राज्य सरकारच्या या आदेशावर भाजपनं टीका केली होती. त्यानंतर, या आदेशात बदल करुन शिवजयंती साजरी करण्यासाठी १०० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी सरकारने दिली आहे. मात्र, बाइक रॅली आणि प्रभात फेरीबाबतचा आदेश कायम ठेवला आहे.

वाचाः

ही आहे नवीन नियमावली

– छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी, १६३० रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी covid-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.

– दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

– तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

– शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिमिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे करोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

– आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या तिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सैनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

– करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here