‘पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार, या भीतीने मुख्यमंत्री चिंताक्रांत आहेत. पूजा चव्हाणला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, त्यांना अभय देण्याचा प्रयत्न होत आहे. राज्याचे दोन गृहराज्यमंत्री कुठे गायब आहेत, यावर प्रतिक्रिया का देत नाहीत,’ असा सवाल भाजपच्या उपाध्यक्ष यांनी सोमवारी केला.
‘पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गृहमंत्री कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत. इतर प्रकरणात सतत प्रसारमाध्यमांपुढे येणारे गृहमंत्री कुठे आहेत? दोन गृहराज्यमंत्रीही दिसत नाहीत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संबंधित मंत्र्यांवर कारवाई होणार की नाही, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. वनमंत्री संजय राठोड यांना संरक्षण देण्यात गृहमंत्री व्यग्र आहेत का,’ असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
‘सत्तेकडे प्रचंड ताकद असते. सर्वसामान्य माणसाचा पाशवी राजसत्तेपुढे टिकाव लागू शकत नाही. राज्यसत्तेचे पाठबळ असल्याने कर असली तरी डर कशाला, ही मानसिकता सत्तधाऱ्यांमध्ये वाढली आहे. राठोड यांचे ‘राजकीय आयुष्य उद्ध्वस्त’ होईल, अशी भीती मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, तर ज्यांनी पूजा चव्हाणला आत्महत्येस प्रवृत्त केले त्यांना अभय मिळेल. मुख्यमंत्र्यांनी व्हायरल झालेल्या त्या ऑडिओ क्लिप ऐकल्या असत्या, तर कोण आयुष्यातून उठले आहे आणि कोणामुळे हे झाले आहे, हे त्यांच्या लक्षात आले असते,’ असेही वाघ म्हणाल्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times