आज मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची माहिती देण्यात आली. यावेळी अभिनेत्री विद्या बालन उपस्थित होती. गुवाहाटीत फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असल्याने आज या सोहळ्याचं विद्या बालनच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या सोहळ्याची नामांकने उद्यापासून मुंबईत स्विकारण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या तांत्रिक पुरस्काराचे वितरणही करण्यात येणार असून अभिनेता विक्की कौशल आणि करण जोहर यंदा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करणार आहेत.
पहिल्यांदाच मुंबईबाहेर हा सोहळा होत असून देशाच्या इतर शहरांमध्येही हा सोहळा पार पडेल, अशी आशा विद्या बालनने व्यक्त केली. यावेळी तिने फिल्मफेअर अॅवार्ड सोहळ्याशी संबंधित आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच फिल्मफेअरने फेब्रुवारीत हा सोहळा आयोजित करण्याची घोषणा केली होती. यावेळी आसाम टुरिझम डेव्हल्पमेंट कार्पोरेशन आणि टाइम्स ग्रुपने या सोहळ्याच्या करारावर स्वाक्षऱ्याही केल्या होत्या. टाइम्स ग्रुपच्या बेनेट कोलमन आणि कंपनी लिमिटेडचे संचालक विनीत जैन आणि आसामचे मुख्यमंत्री सर्बानंदन सोनोवाल यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. यावेळी विनीत जैन यांनी आजचा दिवस ऐतिहासिक आणि मैलाचा दगड ठरणारा असाच आहे, असं सांगितलं होतं. आम्ही ६५वा फिल्मफेअर अॅवार्ड सोहळा गुवाहाटी या सर्वांग सुंदर शहरात आयोजित केला आहे. आसामसाठी सिनेमा काही नवा नाही. तर आसाम आणि सिनेमाचं अतूट नातं आहे, असंही जैन यांनी सांगितलं होतं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times