मुंबई: क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने रिक्षा थांबवून कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला चार तृतीयपंथीयांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली. छेडा नगर जंक्शनजवळ ही घटना घडली. या प्रकरणी चारही तृतीयपंथीयांना अटक केली आहे.

विनोद सोनावणे (वय ३८) असे मारहाण झालेल्या वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. विक्रोळी वाहतूक शाखेत ते कार्यरत आहेत. छेडा नगर जंक्शनजवळ ते वाहतूक नियमन आणि वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई करत असताना ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान, सोनावणे हे वाहतूक नियमन करत असताना, एका रिक्षातून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेण्यात येत होते. त्यांनी रिक्षा थांबवली आणि ई-चालानची प्रक्रिया सुरूवात केली. त्यांनी रिक्षा क्रमांकाचा फोटो काढला. ते फोटो काढत असतानाच, त्याच रिक्षातून प्रवास करणारे चार तृतीयपंथीय खाली उतरले आणि त्यांनी सोनावणे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

चारही तृतीयपंथीयांनी सोनावणे यांना शिवीगाळ केली. त्यांनी मारहाण केली. तसेच गणवेशही फाडला. लव्हली पाटील नावाच्या तृतीयपंथीयाने माझी टोपीही काढून फेकून दिली, असे सोनावणे यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच त्यांनी वॉकीटॉकीही फोडून टाकला. या प्रकरणी ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. लव्हली पाटील (वय २७), विकी कांबळे (२६), तनू ठाकूर (२४) आणि जेबा शेख (२४) अशी अटक केलेल्या चारही तृतीयपंथीयांची नावे असून, ते घाटकोपरमधील पंचशीलनगरमधील रहिवासी आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here