येत्या तीन तासांमध्ये मुंबई आणि परिसरातील अनेक भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस, पिकाचे नुकसान
राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळला असून काही भागांमध्ये गारपीटीही झाली. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याचे वृत्त आहे. परिसरात सगळीकडे गारांचा खच पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, मका अशा पिकांचे नुकसान झाले आहे.
नाशिकलाही जोरदार पावसाची हजेरी
नाशिकमध्येही अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला असून नाशिकमधील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. लासलगाव परिसरातही जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. तसेच अंतापूर, ताहराबाद, पिंगळवाडे परिसरात गारांसह पाऊस कोसळला.
अहमदनगर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली असून, काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times