म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेल्या सर्व संशयित १५ प्रवाशांना तपासणीअंती करोनाचा संसर्ग झालेला नसल्याचे पुण्यातील एनआयव्ही संस्थेने कळवले आहे. त्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या या रुग्णांना घरी सोडण्यात येत आहे. पुणे येथे दाखल असलेल्या पाच रुग्णांना तर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात असलेल्या पाचपैकी तीन जणांना घरी सोडले आहे. उरलेल्या दोघांना उद्यापर्यंत घरी सोडण्यात येणार आहे.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी रुग्णालयात दाखल केलेल्यांना घरी सोडण्यासाठी केंद्र शासनाने राज्याला मार्गदर्शक सूचना दिल्या. त्यानुसार संबंधित व्यक्तीला संसर्ग झाला नसल्याचे चाचणीत स्पष्ट झाले तरी त्याला घरी सोडल्यानंतर १४ दिवस त्याचा पाठपुरावा करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

५,१२८ प्रवाशांची तपासणी

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल तपासणी सुरू असून आतापर्यंत ५,१२८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. त्यापैकी चार प्रवासी महाराष्ट्रातील आहेत. क्षेत्रीय सर्वेक्षणात आढळलेले आणखी ३४ प्रवासी असे एकूण ३८ प्रवासी बाधित भागातून आलेले आहेत. सर्व प्रवाशांचा त्यांच्या आरोग्यस्थितीबाबत नियमित पाठपुरावा करण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here