राज्यात करोनाचे रुग्ण पुन्हा वाढल्याने राज्यातील काही जिल्ह्यात पुन्हा निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांनी नियम न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले होते, त्यानंतर आज मुख्यमंत्री संचारबंदी किंवा निर्बंधांबाबत काही निर्णय घेणार का, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई, पुण्यासह विदर्भात अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांतही करोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. तीन जिल्ह्यांत कडक नियम लागू केले आहेत. तर, पुण्यातही सोमवारपासून रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
वाचाः
राज्यात १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सुरु करण्यात आली. त्यानंतर १० फेब्रुवारीपासून मुंबईत पुन्हा करोनाचा आलेख वाढला आहे. त्यामुळं पुन्हा लोकल संदर्भात काही निर्णय घेण्यात येणार का?, याकडेही सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तसंच, मुख्यमंत्री कोणती मोठी घोषणा करताहेत हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
वाचाः
दरम्यान, राज्यात सध्या मिशन बिगीन अंतर्गंत अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन सरकारने वाढवला असला तरी अनेक निर्बंध शिथील करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. धार्मिक स्थळे, व्यायामशाळा, मुंबईतील लोकलसेवा याला सरकारने परवानगी दिली आहे. तर, राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारचे शटर पुन्हा खुले झाले आहे. करोनाच्या अनुषंगाने त्यांना गाइडलाइन्सही देण्यात आल्या आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times