अहमदाबाद : भारताचा एक महत्वाचा खेळाडू आता पूर्णपणे फिट झाला आहे. त्यामुळे आता तिसऱ्या आणि कसोटी सामन्यात तो खेळणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात या खेळाडूला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो पूर्णपणे सावरला असून आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आता तो खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात असताना दुखापत झाली होती. त्यामुळेच भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्याची निवड करण्यात आली नव्हती. पण तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यांसाठी त्याची निवड भारतीय संघात करण्यात आली होती. पण त्यासाठी उमेशला फिटनेस टेस्ट पास करणे बंधनकारक होते.

रविवारी उमेशची फिटनेस टेस्ट अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर घेण्यात आली होती. या फिटनेस टेस्टमध्ये तो पास झाला आहे. त्यामुळे आता त्याचा समावेश इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत करण्यात आला आहे. त्याचबरोबर शार्दुल ठाकुरला संघाने विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी पाठवले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबाद येथे २४ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. हा सामना दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता आता सर्वांनाच लागलेली आहे. कारण या भव्य मैदानातील हा पहिलाच सामना असणार आहे. त्यामुळे हे मैदान भारतासाठी लकी ठरते का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दोन कसोटी सामने झाले आहेत. यानंतर होणारे दोन्ही कसोटी सामने अहमदाबाद येथेच खेळवण्यात येणार आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेला १२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. ही मालिका १२ ते २० मार्च या कालावधीत होणार आहे. हे सर्व सामने अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. शनिवारी भारताच्या ट्वेन्टी-२० संघाची घोषणा बीसीसीआयने केली आहे. या संघात १९ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. या संघात सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि राहुल तेवातिया या तीन नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here