पुणे, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासनानं कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे राज्यातही पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. फेक न्यूज व खोटे मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी इशारा दिला होता. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. तरीही सोशल मीडियावर मुंबई पोलिसांच्या नावानं काही मेसेज व्हायरल आहेत. यामध्ये मुंबईत जर सार्वजनिक ठिकाणी मास्क घातला नाही, तर त्यासाठी १ हजार रुपये दंड ठोठावला जाईल, असं म्हटलं आहे. या व्हायरल मेसेजवर मुंबई पोलीस आयुक्तांनीच खुलासा केला आहे.
वाचाः
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक ट्वीट केलं आहे. प्रिय मुंबईकर! आपल्याला फेक न्यूज विकणारे पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. यावेळी त्यांनी म्हटलंय की मास्क घातला नाही, तर तुम्हाला १ हजार रुपये दंड केला जाईल. पण तुमच्या सुरक्षेशी झालेली तडजोड कितीही मोठी रक्कम असली, तरी भरून निघणार नाही. पण दंडाची रक्कम म्हणाल, तर मास्क न घातल्याबद्दल तुम्हाला मुंबईत फक्त २०० रुपये दंड ठोठावला जातो, असं त्यांनी म्हटलं आहे.
वाचाः
दरम्यान, मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास पालिका आणि पोलिसांनी दंडवसुली सुरू केली आहे. पालिकेने ही कारवाई गेल्या काही दिवसांपासून हाती घेतली आहे. त्याप्रमाणे, रविवारी सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या १४,१०० व्यक्तींकडून २८ लाख २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल २०२० ते २१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत १६ लाख दोन हजार ५३६ लोकांवर कारवाई झाली आहे. त्यातून ३२ कोटी ४१ लाख १४ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times