यावेळी गावस्कर म्हणाले की, ” भारतामध्ये सर्वाधिक क्रिकेटचे चाहते हे गुजरातमध्ये आहे. पश्चिम बंगालमध्येही चाहते आहेत, पण तिथे जास्त फुटबॉलचे चाहते आहेत. मुंबईमध्ये विविध खेळ खेळले जातात, त्यामुळे तिथे चाहते विभागलेले पाहायला मिळतात. उत्तर भारतामध्ये हॉकीचे वेड जास्त आहे. पण गुजरातमध्ये क्रिकेटशिवाय अन्य कोणता खेळत जास्त दिसत नाही. त्यामुळेच गुजरातमधल्या लोकांसाठी क्रिकेट हे सर्व काही आहे आणि या गोष्टीचा अनुभव सामना पाहताना येत आहे.”
इंग्लंडचा कर्णधार जो रूटने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभी करता येईल अशी इंग्लंडचा हेतू होता. पण १००वी कसोटी खेळणाऱ्या इशांत शर्माने तिसऱ्याच ओव्हरमध्ये इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्याने डॉमनिक सिबलीला शून्यावर बाद केले. त्यानंतर जॉनी बेयरस्टोला अक्षरने शून्यावर बाद करून इंग्लंडची अवस्था २ बाद २७ केली. बेयरस्टो बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या जो रूटने क्रॉली सोबत ४७ धावांची भागिदारी केली. ही जोडी इंग्लंडला सावरेल असे वाटत असताना अश्विनने रुटची विकेट घेतली. त्यानंतर पहिले सत्र संपल्याआधी अक्षरने क्रॉलीला ५३ धावांवर बाद केले. दुसऱ्या सत्रात इंग्लंडची आणखी वाइट अवस्था झाली. ८१ धावांवर त्यांच्या दोन विकेट पडल्या. ओली पोपला अश्विनने तर अक्षरने बेन स्टोक्सला बाद केले.
भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या तळातील फलंदाजांना मोठी धावसंख्या उभी करू दिली नाही. जोफ्रा आर्चरला अक्षरने, जॅक लीचला अश्विनने बाद केले आणि पाहूण्यांची अवस्था ८ बाद ९८ अशी केली. अखेर च्या दोन फलंदाजांना झटपट बाद करून भारताने इंग्लंडला फक्त ११२ धावांवर रोखले. भारताकडून अक्षर पटेलने सलग दुसऱ्या कसोटीत पाच विकेट घेतल्या. त्याने ३८ धावात ६ विकेट घेतल्या. तर आर अश्विनने २६ धावात ३ विकेट घेतल्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times