आपल्या सर्वांना वैयक्तिक सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्याची गरज आहे. तुम्ही ज्या प्रकारे विचार करता, त्याच प्रकारे सर्वोत्कृष्ट कामगिरी करायला सिद्ध व्हा. प्रत्येक खेळाडूने १२० टक्के कामगिरी करावी, अशी माझी अपेक्षा आहे. याची जाणीव खेळाडूंनाही होत आहे, असं विराट कोहलीने म्हटलं आहे. जिंकण्यासाठी तुम्हाला अशाच प्रकारचे फंडे शोधावे लागतील. टीम इंडियाबाबत बोलायचं झालं तर गेल्या दोन ते तीन वर्षात आमच्यात खूप मोठा बदल झाला आहे. त्याचे परिणामही आम्ही पाहिले आहेत. अर्थातच प्रत्येक सामना जिंकता येणार नाही. पण अशाप्रकारच्या एकतर्फी सामन्यात विजय मिळवता येऊ शकतो आणि त्याचा आनंदही तितकाच मोठा असतो, असंही तो म्हणाला.
आम्ही ज्या प्रकारे न्यूझीलंड विरोधात खेळलो. त्यावर प्रत्येकाला अभिमान आहे. रोहितला दुखापत झाल्यानंतर आज मैदानावर सर्व तरुण खेळाडू होते. दबाव असतानाही सर्वांनी परिस्थिती चांगली हाताळली, असंही त्याने सांगितलं. यावेळी त्याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनचं समर्थनही केलं. भारताकडून पराभव झाल्यानंतरही ब्लॅक कॅप संघाचं नेतृत्व करण्यास केन सक्षम आहे. न्यूझीलंडचा संघ योग्य व्यक्तिच्या हातात आहे. त्याला माझ्या शुभेच्छा आहेत. ज्या संघासोबत खेळावं असं प्रत्येकाला वाटतं, अशा प्रकारचा न्यूझीलंडचा संघ आहे, असंही विराट म्हणाला. केन आणि माझी विचार करण्याची पद्धत एकसारखी आहे. जगातील दोन टोकावरील देशात असून सुद्धा आमची विचार करण्याची पद्धत सारखीच आहे, हे पाहून आनंद होतो, असंही तो म्हणाला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times