सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यातील आवाज संजय राठोड यांचा असल्याचे आरोप आहेत. हा पुरावा हाती आल्यानंतर विरोधकांनी संजय राठोड यांना लक्ष्य केलं. त्यानंतर आपली बाजू मांडण्याऐवजी राठोड हे जवळपास १५ दिवस समोरच आले नाहीत. १५ दिवसांनंतर त्यांनी बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले व शक्तिप्रदर्शन केले. तिथं त्यांनी आपली बाजू मांडताना, मला बदनाम करण्याचं हे कारस्थान असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र, राठोड यांच्या या खुलाशाचा काहीही उपयोग झालेला नाही.
वाचा:
विरोधक राठोड यांच्या विरोधात अधिकच आक्रमक झाले असून ठाकरे सरकारलाही रोजच्या रोज प्रश्न विचारत आहेत. त्यातच करोनाच्या काळात राठोड यांनी केलेलं शक्तिप्रदर्शनही त्यांच्या अंगलट आलं आहे. त्यावरूनही सरकारवर टीकेची झोड उठली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राठोड यांना नारळ देण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
पोहरादेवीच्या दर्शनानंतर राठोड यांनी मुंबईत मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी दीड तास वेटिंगवर ठेवून त्यांना काही मिनिटांची वेळ दिली. तेव्हाच राठोड यांना जावे लागणार असे संकेत मिळाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी राठोड यांना स्पष्ट संदेश दिला आहे. माझ्या निर्णयाची वाट पाहू नका. स्वत:हून निर्णय घ्या, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं समजतं. त्यामुळं राठोड लवकर राजीनामा देण्याची शक्यता आहे.
येत्या १ मार्चपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यात राठोड यांच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. विरोधकांना ही संधी मिळू नये म्हणून अधिवेशनाआधीच राठोड हे पायउतार होतील, अशी शक्यता आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times