नागपूरः राज्यात करोना संसर्गाचा कहर कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या संख्येनं रुग्ण वाढत असल्यानं पुन्हा लॉकडाऊनची भीती व्यक्त केली जात आहे. या मुद्द्यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांनी मोठी माहिती दिली आहे. गर्दी कमी करण्यासाठी नवे निर्णय घेण्यात येतील, असं ते म्हणाले आहेत. तसंच, विदर्भातील वाढत्या रुग्णवाढीवरही भाष्य केलं आहे.

महाराष्ट्रातील वाढती करोनाची रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे हे खरं आहे. पण, नागपुरातही पुढील एक- दोन दिवसात ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे. मी त्याला लॉकडाऊन म्हणणार नाही. कारण लॉकडाऊन परवडणार नाही. लॉकडाऊन वगळता काय निर्णय घेता येईल याबाबत मी लवकरच एक आढावा बैठक घेऊन पालकमंत्र्यांशी संवाद साधणार आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तसंच, करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार गंभीर आहे. अधिवेशनाचा काळही कमी केला आहे. नागपुरहे सध्या करोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. विदर्भातील चार जिल्ह्यांत अंशतहा लॉकडाऊन आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांसोबत ते बोलत होते.

कार्यक्रमांवर बंदी

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं नागपुरात सगळ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मंगलकार्यावर गर्दी होऊ नये यासाठी वॉच ठेवण्यात येत आहे. बाजरपेठेसाठी टाइमटेबल तयार करुन गर्दी वळवण्याचा निर्णय घेण्यात येईल. तसंच, राज्यातही मंगल कार्यालयांवर बंधनं घालण्याचे संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

मुंबई लोकलबाबत निर्णय?

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून करोनाची रुग्णसंख्या वाढत असून त्यात उतार आलेला नाहीये. त्यासंदर्भातही विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई लोकलच्या फेऱ्या कमी करण्याचा विचार आहे. गर्दी कमी करण्यासाठी नवे निर्णय घेण्यात येईल. काही बंधनं घालावे लागतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.

पोहरादेवी गर्दी

संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे जमलेल्या गर्दीबाबत कारवाई होणार का या प्रश्नावरही वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री कोणाला पाठीशी घालणार नाहीत आणि त्या गर्दीला जो जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई होईल, असं ते म्हणाले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here