मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. शिवाय चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे. हा चित्रपट १० जून २०२१ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी आणि अंकित मोहन यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या वीरांची गाथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. वीर मावळे बाजीप्रभू देशपांडे यांचा घोडखिंडीतील पराक्रम या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
‘पावनखिंड’ या चित्रपटाची कथा समस्त मराठी जनाचे राजे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एका घटनेवर आधारीत आहे. स्वराज्याची लढाई लढताना महाराजांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. तेव्हा त्यांच्या पाठीशी होते ते म्हणजे महाराजांचे मावळे. जेव्हा बिजापूरच्या सिद्धी जौहरने पन्हाळगडाला वेढा घातला होता, तेव्हा अवघ्या ६०० मावळ्यासोबत गडावरून सुखरूप बाहेर पडण्याची योजना महाराजांनी आखली होती.
परंतु, महाराज आर्ध्यावाटेत असताना सिद्धी जौहरला त्यांच्या सुटकेबद्दल कळालं. तेव्हा महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचेपर्यंत सिद्दीला रोखण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे यांची ही कहाणी आहे. बाजीप्रभू यांनी अवघ्या ३०० मावळ्यांसोबत मिळून दहा हजार गनिमांसोबत लढाई केली होती. या लढाईत ते धारातीर्थी पडले होते. मराठ्यांचा हा अभिमानास्पद इतिहास मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा दिग्दर्शकांचा प्रयत्न आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times