वाचा:
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड हे संशयाच्या भोवऱ्यात आहेत व त्यांच्या राजीनाम्याची सातत्याने विरोधी पक्षाकडून मागणी करण्यात येत आहे. राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्चपासून सुरू होत असून या पार्श्वभूमीवर विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच तापवला आहे. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा मुद्दा उचलत पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्यवादी आहेत आणि पूजा चव्हाण या तरुणीच्या कुटुंबाला ते निश्चितपणे न्याय देतील, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यावरच बोट ठेवत पाटील यांनी फटकेबाजी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सत्यवादी आहेत म्हणूनच आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांना सध्या आपल्या खुर्चीची काळजी लागली आहे, असा टोला पाटील यांनी हाणला.
वाचा:
महाविकास आघाडी सरकारमधील सहा मंत्र्यांवर आतापर्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले आहेत पण यातील एकाही मंत्र्यावर आजपर्यंत कारवाई झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारचे मार्गदर्शक यावर काहीच बोलायला तयार नाहीत, असे टीकास्त्रही पाटील यांनी सोडले. पूजा चव्हाणची आत्महत्या पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. या पोलीस ठाण्याला पाटील यांनी सवाल केला. पूजा चव्हाण प्रकरणात वानवडी पोलिसांना काय सापडलं, हे समोर यायला हवं. ज्या ऑडिओ क्लिप आढळल्यात त्यातील आवाज संजय राठोड यांचा नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे का, तेही कळू द्या, असे आव्हान पाटील यांनी दिले.
वाचा:
दरम्यान, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. असे असताना त्यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध आज एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यावर पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. चित्रा वाघ यांच्या पतीवर आताच कारवाई का केली जात आहे?, असा प्रश्न विचारतानाच आमच्या नेत्यांना अशाप्रकारे कितीही त्रास दिला तरी आम्ही घाबरणार नाही. चित्रा वाघ या वाघिणीसारख्या लढत आहेत आणि त्यांचा लढा सुरूच राहील. पक्ष आणि आम्ही सगळे नेते वाघ बनून त्यांच्या मागे उभे आहोत, असे पाटील म्हणाले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times