मुंबई: राज्यात करोनाची पुन्हा दुसरी लाट येतेय की काय याची शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढतेय, मी फेसबुक लाइव्हमध्ये हेच सांगत होतो मी निष्काळजीपणा करु नका, हा व्हायरस आहे तो म्हणतोय मी पुन्हा येईन पुन्हा येईन…. काळजी घ्या. पण दुर्देवानं थोडं इकडे तिकडे झालं आणि व्हायरस परत आला, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्ष नेत यांना लगावला आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी सभागृहात भाषण केले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी तुफान फटकेबाजी करत विरोधकांवर हल्लाबोल चढवला. तसंच, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची मी जबाबदार मोहिमेवर सरकारवर निशाणा साधला होता. यावरही मुख्यमंत्र्यांनी पलटवार केला आहे. ‘सरकार जनतेची खबरदारी घेतंय, राज्यात आपण जम्बो कोविड रुग्णालय आपण उभं केलंय. ज्या केंद्रीय आर्थिक पाहणीच्या अहवालाचा फडणवीस यांनी उल्लेख केला त्याची मी चौकशी केली. त्यानंतर मला असे कळलं की ज्यांनी नोटबंदीची स्तुती केली होती ते या कोविड टास्कचे अध्यक्ष आहेत. डॉक्टर आहेत पण अर्थशास्त्र्याचे आहेत. या आरोग्याच्या प्रश्नात किंवा आप्पतीकाळात अर्थशास्त्राचे डॉक्टर बरे की वौद्यकिय शास्त्र्याच्या डॉक्टरचा कंपाऊड बरा. ही काय देशाची थट्टा आहे का?,’ असा सवाल यांनी केला आहे.

‘बिहारमधील करोनाच्या कामाचा भांडाफोड एका वृत्तपत्रानं केला. त्यावरुन टास्क फोर्स निष्कर्ष काढतंय आणि त्याच्यार विश्वास ठेवून महाराष्ट्रावर टीका करताय. महाराष्ट्रानं एकसुद्धा रुग्ण लपवलेला नाही आणि लपवू देणार नाही. मार्च एप्रिल महिन्यात कोरोनाची सुरुवात झाली ती भयानक परिस्थिती होती. बेड्स नव्हता, ऑक्सिजन नव्हता, औषधं नव्हता, आजही औषधं नाहीयेत. पण खोटेपणा करणं आमच्या रक्तात नाही आम्ही तो कधी केला नाही,’ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

‘पंतप्रधानांनी अचानक लॉकडाऊन केला. मी त्यांना फोन केला. लोकल थांबवण्यासाठी प्रयत्न करा, मजुरांना जाण्यासाठी ट्रेन द्या पण तेंव्हा त्यांनी काही नाही केले. लॉकडाऊन केले आणि मग लोक लाखो लोक घरी जात असतांना तांडे च्या तांडे पायी गेले. आपण या लोकांना मोफत अन्नधान्य दिले, त्यांच्या राज्यात जाण्याची व्यवस्था केली. आपापल्या राज्यात गेल्यानंतर उत्तरप्रदेश आणि बिहारच्या लोकांनी इथे उगीच आलो, महाराष्ट्राने यापेक्षा आमची काळजी घेतली असे प्रशंसोद्गार काढले,’ असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

‘आरोग्य सुविधा वाढवत आहोत, जर्मनी, इटलीसारख्या अनेक देशांनी पुन्हा लॉकडाऊन केले. आपण सावधपणे पुढे जात आहोत, गरीबांची चुल विझवायची नाही म्हणून “मी जबाबदार” मी कुटुंब तर माझे कुटूंब सुरक्षित” ही मोहिम आपण राबवली आहे. मला व्हिलन ठरवले तरी चालेल,वाईट म्हटले चालले तरी मला पर्वा नाही. मी माझ्या राज्याशी बांधील आहे. त्यांची काळजी घेणे माझं कर्तव्य आहे, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. तसंच, संकटाशी खेळ करू नका. आमदार खासदार मृत्यूमुखी पडले हा व्हायरस कुणाला ओळखत नाही. थट्टा कुणाची करता, माझे कुटुंब माझी जबाबदारीची थट्टा करताय, करा, पण सामान्यांच्या जीवाशी खेळू नका,’ असंही ते म्हणाले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here