मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी डोंबिवली एमआयडीसमधील रसायनिक प्रदूषणामुळे गुलाबी झालेल्या रस्त्यांची पाहणी केली. तसेच कल्याण-डोंबिवलीतील प्रदूषित नाल्यांचीही पाहणी केली. डोंबिवलीतील रस्ते गुलाबी का झाले? त्याची कारणेही त्यांनी समजून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना कारखान्यांची वर्गवारी करण्याचे आदेश दिले. तसेच रासायनिक प्रदूषण निर्माण करणाऱ्या घातक कारखान्यांवर तीन टप्प्यात कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच कल्याण-डोंबिवलीतील रस्ते, स्वच्छता आणि सुशोभिकरणाच्या कामासाठी १०० कोटी रुपये आर्थिक सहाय्य करण्यात येत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
तसेच रासायनिक द्रव्य घेऊन जाणाऱ्या जुन्या पाइपलाइन्स बदलण्याचे आदेशही त्यांनी दिले. त्याशिवाय नागरी वस्तींपासून या कारखाण्यांना दूर हटवण्यासाठीचा सर्व्हे अहवाल येत्या १५ दिवसांत सादर करण्याचे आदेशही उद्धव ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, तत्पूर्वी ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कळवा, पारसिक, कोलशेत, वाघबीळ, बाळकूम-साकेत, कोपरी, शास्त्रीनगर, नागलाबंदर वॉटरफ्रंट प्रकल्पांचे ई-भूमीपूजनही केलं. त्यानंतर हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’चे लोकार्पण केले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times