बिहार विधानसभा निवडणूक असो की राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुका, हैदराबाद महापालिका निवडणूक असो की गुजरातमधील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका भाजपची कामगिरी चांगली राहिली आहे. गुजरातमधील महापालिका निवडणुकांमध्ये आणि सर्व ३१ जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा विजय झाला. २०१५ मध्ये काँग्रेसने २२ जागा जिंकल्या होत्या. ग्रामीण भागातही भाजपचा मोठा विजय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास कामांवर शेतकरी आनंदी आहेत आणि नवीन कृषी कायदे आपल्या हिताचेच असल्याचं त्यांना कळलंय, असा दावा जावडेकर यांनी केला.
विरोधकांची आडकाठी नको
लडाख हिल काउन्सिल, बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिलसह राजस्थानमधील पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा शानदार विजय झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या डीडीसी निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. शहरांपासून ते गावांपर्यंत भाजपला जनतेने पाठिंबा दिला आहे. काँग्रेस मात्र डफली वाजवत बसली आहे. विरोधी पक्षांची आडकाठी जनतेला पसंत नाही. निवडणुकीत काँग्रेसचं सुपडा साफ होतोय. तरीही काँग्रेस वठणीवर येत नाहीए, असं अशी टीका जावडेकर यांनी केली.
‘आणीबाणीत काय झालं? हे सर्वांनाच माहिती आहे’
आजी इंदिरा गांधी यांचा आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता, असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. काँग्रसने कुठल्या संस्थेवर कब्जा केला नाही, असंही ते म्हणाले. आणीबाणीच्या काळात संस्थांवर कशा प्रकारे कब्जा केला गेला, आवाज उठवणाऱ्या विरोधकांना कसं तुरुंगात डांबलं गेलं आणि त्यांचा छळ केला गेला, हे सर्वांना माहिती, असं प्रकाश जावडेकर म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times