करोनाची साथ आल्यानंतर जगभरातच लॉकडाऊनचा उपाय राबवण्यात आला होता. महाराष्ट्रातही लॉकडाऊन होता. मात्र, राज्य सरकारनं घातलेले अनेक कठोर निर्बंध मनसेला पटले नव्हते. त्यामुळं लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काही महिन्यांनंतर मनसेनं लोकल ट्रेन, वाइन शॉप उघडण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. खुद्द राज ठाकरे यांनी राज्य सरकारला अनेकदा पत्रे पाठवली होती.
मास्क लावून काळजी घेण्याच्या राज्य सरकारच्या सूचनेचे राज यांनी कधीच पालन केले नाही. करोनाच्या सुरुवातीच्या काळात मंत्रालयात झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला राज ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मास्क सोबत नेले होते. मात्र, ते घातले नव्हते. त्यानंतर मराठी भाषा दिनानिमित्त २७ फेब्रुवारी मनसेनं शाखा-शाखांवर ‘मराठीतून स्वाक्षरी’ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यापैकी एका कार्यक्रमात राज ठाकरे स्वत: सहभागी झाले होते. मात्र, त्यांनी मास्क लावले नव्हते. याबद्दल पत्रकारांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर, मी मास्क घालतच नाही. तुम्हालाही सांगतो,’ असं ते म्हणाले होते. सत्ताधारी नेत्यांनी त्यावरून त्यांच्यावर टीकाही केली होती. राज ठाकरेंना करोनाची भीती वाटत नसेल पण त्यांनी मास्क घातले नाही तर इतरांना करोना होऊ शकतो, असं टोला अजित पवार यांनी काल विधान परिषदेत बोलताना हाणला होता. त्यानंतरही राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहे.
नाशिकमध्ये आज माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी राज यांचं स्वागत केलं. मात्र, त्यावेळी मुर्तडक यांनी एकावर एक दोन मास्क लावले होते. ते पाहून राज ठाकरे यांनी ‘मास्कवर मास्क लावलाय का?’ अशी विचारणा केली. त्यांनी हे विचारताच मुर्तडक यांनी स्मितहास्य करत मास्क तोंडावरून खाली ओढले. नाशिकमध्ये विनामास्क नागरिकांना दंड ठोठावला जात आहे. राज ठाकरे यांच्यावर आता काय कारवाई होणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times