लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर मुंबईतील सर्व हॉटेल, पब, क्लब, बारमध्ये ग्राहकांची गर्दी वाढत आहे. मास्क आणि सुरक्षित अंतराचे नियम पाळले जात नसल्याने गेल्या काही दिवसात पालिकेने अनेक हॉटेलांवर पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत. हॉटेलमध्ये करोना संबंधित नियमांचे पालन होते की नाही, याची खात्री करण्यासाठी रात्री उशिरा अचानक धाड टाकून तपासणी करण्यात येत आहे.
दोन दिवसापूर्वी अंधेरी पश्चिमेकडील एस. व्ही. रोड लगत असणाऱ्या शॉपर्स स्टॉप समोरील राधाकृष्ण हॉटेलमध्ये धाड टाकण्यात आली होती. यावेळी हॉटेलमधील कर्मचारी नियमांचे पालन करत नसल्याचे लक्षात येताच त्यांना करोना चाचण्या करण्यास सांगण्यात आले होते. त्याचे अहवाल शुक्रवारी आले असून दहा कर्मचाऱ्यांना करोना झाल्याचे आढळून आले आहे.
पालिकने केले हॉटेल सील
या कर्मचाऱ्यांना तातडीने संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. पालिकेने हे हॉटेल सील केले असून नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याशिवाय हॉटेल पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. या घटनेचा धडा घेत पालिका मुंबईतील अन्य हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्याचे आवाहन हॉटेल व्यावसायिकांना केले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times