म. टा. प्रतिनिधी, नागपूर: अनेक माणसांवर हल्ले केल्याने वादग्रस्त ठरलेल्या आणि नंतर मारल्या गेलेल्या अवनी वाघिणीच्या मादी शावकाला पेंच व्याघ्र प्रकल्पात शुक्रवारी मुक्त करण्यात आले. आईपासून वेगळे झालेल्या या शावकाला मागील दोन वर्षांपासून प्रशिक्षण देण्यात येत होते.

अवनी वाघिणीच्या मृत्युनंतर या शावकाला २२ डिसेंबर, २०१८ पेंचमधील तितरालमांगी येथील सुमारे पाच हेक्टर बंदिस्त क्षेत्रात दोन वर्षांपूर्वी आणले गेले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमांनुसार तिला प्रशिक्षण देण्यात येत होते. राज्याच्या वन्यजीव विभागाच्या प्रमुखांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे तिच्यावर लक्ष ठेवण्यात येत होते. या समितीच्या शिफारशीनंतर या वाघिणीला निसर्गमुक्त करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला होता. प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीने मान्यता दिल्यानंतर तिला रेडिओ कॉलर करण्यात आले होते.

शुक्रवारी या वाघिणीच्या अधिवासाचा दरवाजा उघडण्यात आला आणि तिला पेंचच्या जंगलात मुक्त करण्यात आले. तीन वर्षे आणि दोन महिने वय असलेली ही वाघिण पीटीआरएप-८४ या नावाने ओळखली जाणार आहे. जमिनीवरून तसेच उपग्रह सिग्नलच्या माध्यमातून तिच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. ही वाघिण जंगलातील मुक्त वातावरणाशी कशा प्रकारे जुळवून घेते याचाही अभ्यास केला जाणार असल्याचे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रवीकिरण गोवेकर यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here