वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्यांच्या प्रकरणातील खटल्यासाठी अलिबाग न्यायदंडाधिकारी न्यायालयात प्रत्यक्ष हजेरी लावण्याविषयी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक यांना मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास सूट दिली आहे. या प्रकरणात एफआयआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी १६ एप्रिलला ठेवून न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने तोपर्यंत गोस्वामींना अलिबाग न्यायालयातील प्रत्यक्ष हजेरीविषयी सूट दिली.
वाचा:
अलिबाग पोलिसांनी या प्रकरणात गोस्वामींबरोबरच अन्य दोघा व्यावसायिकांविरोधात तब्बल १९०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यालाही गोस्वामींनी याचिकेत दुरुस्ती करून आव्हान दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे याविषयी सुनावणी झाली. तेव्हा, ‘मूळ याचिकेत आम्ही एक अर्ज केला आहे. अलिबाग न्यायालयाने गोस्वामी यांना १० मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. परंतु, उच्च न्यायालयातील याचिका प्रलंबित आहे आणि करोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता तूर्तास त्या न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळावी, अशी विनंती आम्ही अर्जात केली आहे’, असे गोस्वामींचे वकील अॅड. संजोग परब यांनी सांगितले. त्यानंतर आम्ही मूळ याचिका १६ एप्रिलला सुनावणीसाठी ठेवत आहोत, असे सांगून खंडपीठाने सांगितले. तसेच तोपर्यंत अलिबाग न्यायालयातील प्रत्यक्ष हजेरीविषयी गोस्वामींना सूट देत असल्याचे आदेशात स्पष्ट केले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times