मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर रस्त्यालगत कार पार्क करण्यात आली होती. या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आणि एक धमकीचे पत्र सापडले होते. या पत्राद्वारे मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना धमकावण्यात आले होते. या घटनेनंतर खळबळ उडाली होती. सुरुवातीला केलेल्या तपासात ही कार मनसुख हिरन यांची असल्याचे उघड झाले होते. विक्रोळीतून ती चोरीला गेल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. या प्रकरणात त्यांचीही चौकशी करण्यात आली होती. दुसरीकडे या घटनेची जबाबदारी एका संघटनेने घेतली होती. दरम्यान, या घटनेवरून राज्याच्या राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली होती. फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात यावा, अशी मागणी केली होती.
या घटनेचा तपास सुरू असतानाच, मनसुख हिरन अचानक बेपत्ता झाले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडला होता. रविवारी अखेर महाराष्ट्र एटीएसने हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अनोळखी व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. हिरन यांच्या पत्नी विमला यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात यापूर्वी हिरन हे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला होता. मुंब्रा पोलीस ठाण्यात एडीआर दाखल करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या निर्देशानुसार हिरन मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला आहे. या मृत्यू प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे ही एटीएसकडे देण्यात आली आहेत. आता या प्रकरणाचा तपास करणार आहे. दुसरीकडे, अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास आता एनआयए करणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा तपास एनआयएकडे सोपवला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times