म. टा. विशेष प्रतिनिधी,मुंबई

लसीकरण झाल्यानंतरही वापरणे बंधनकारक आहे. तसेच करोनासंसर्गापासून सुरक्षित राहायचे असेल तरीही मास्कचा वापर करायलाच हवा. मात्र हा मास्क अनेकदा योग्य पद्धतीने घातला जात नाही. त्यामुळे करोना संसर्ग होण्याचा धोका टळत नाही. त्यामुळे मास्कचा वापर योग्यप्रकारे करावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी दुहेरी मास्कचा वापर अधिक लाभदायक असल्याचे सांगितले आहे. गर्दीच्या ठिकाणी तसेच प्रवासामध्ये, सार्वजनिक ठिकाणी मास्कमुळे संरक्षण मिळते. कॉटनच्या कापडाचे दोन मास्क एकमेकांवर लावले तर या मास्कमुळेही संरक्षण मिळू शकते. गर्दीच्या ठिकाणी संसर्गाचा धोका टाळण्यासाठी दुहेरी मास्क लावणे अधिक आरोग्यदायी असल्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. आर. व्ही. नायर म्हणाले, ‘एन ९५ मास्क अनेकजण वापरतात. मात्र काही मास्कला पुढे एक प्लास्टिकची छोटी टोपी बसवलेली असते. त्यामुळे गुदमल्यासारखे होत नाही, असे अनेकांना वाटते. मात्र या प्रकारचा मास्क लावणे टाळावे यातून संसर्ग होण्याची भीती असते.’

कापडाचे मास्क सुरक्षित असले तरीही ते वेळोवेळी धुवायला हवेत, अन्यथा त्वचेवर अॅलर्जीमुळे चट्टे, पुरळ उठू शकते. उन्हाळ्यामध्ये घाम अधिक आल्यामुळे चेहऱ्यावरचा घाम मास्कमध्ये झिरपून त्याचीही अॅलर्जी निर्माण होऊ शकते. त्यामुळे बाहेर प्रवास करत असाल तर मास्कचे दोन जोड सोबत ठेवावे व गरजेनुसार ते बदलावेत, असाही सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

रस्त्यावरील विक्रेत्यांकडून खरेदी नको

चांगला दर्जा नसलेल्या कापडांचे, तसेच अन्य मटेरिअलचे मास्क लावणे टाळा. रस्त्याच्या कडेला काही वेळा मास्क विक्रीसाठी उघड्यावर ठेवलेले असतात. त्यावर धूळ बसलेली असते. त्यातूनही संसर्ग होऊ शकतो. केएन ९५ मास्क हे चीनमध्ये बनवले असून, त्यातून ९५ टक्के अपायकारक धुलीकण आता जाऊ शकत नाहीत, असाही दावा केला जातो. हे मास्क लावण्यासाठी असलेली दोरी ही कानाच्या मागे लावावी लागते. त्यामुळे कान ओढले जाऊन दुखतात. त्यातून वेगळे त्रास उद्भवतात.

अशी करा निवड

मास्क निवडताना तो नाक, तोंड पूर्णपणे झाकेल अशा प्रकारचा असावा. मास्क हा केवळ तोंडावर लावू नका, तो नाकावरही असायला हवा. त्यामुळे समोरून कुणी शिंकले वा खोकल्यास ती थुंकी अंगावर उडत नाही. स्वतःसह दुसऱ्यांनाही संसर्गापासून संरक्षण मिळते. मास्क कापडाचे असतील तर ते स्वच्छ धुवायला हवेत. मास्क कधीही कुठेही टाकू नका. ते एका व्यवस्थित स्वच्छ डब्यामध्ये बंद करून ठेवा. वापर झाल्यानंतर एका पिशवीमध्ये ते ठेवणे योग्य. मास्कच्या नाड्या सैल झाल्यास तो मास्क वापरू नका. केवळ मास्कवरील नक्षी वा रंग पाहून मास्क निवडू नका, तो किती सुरक्षित आहे याचा विचार करा.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here