म. टा. प्रतिनिधी, मुंबई

एसआरए प्रकल्पातील घर आता झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी विकता येणार आहे. त्यासाठी राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार आहे, असे संकेत गृहनिर्माण मंत्री यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिले. सध्या इमारत बांधल्यानंतर पाच वर्षांपर्यंत घर विकता येत नाही. अनेक प्रकल्प पूर्ण व्हायला पाच ते दहा वर्षे लागतात. त्यामुळे झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी एसआरएतील घर विकण्याचा निर्णय लवकरच होणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

एसआरएमधील विकलेल्या घरांप्रकरणी नोटीस पाठवल्या. याबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्र्यांची समिती नेमण्यात आली आहे. त्यात अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक, शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, परिवहनमंत्री अनिल परब, मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख यांचा समावेश आहे. इमारत बांधल्यानंतर पाच वर्षांच्या आत घर विकता येत नाही. त्याऐवजी झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी घर विकता येणार असा नियम बनवायला पाहिजे. तसा विचार आम्ही करीत आहोत. समिती त्याबाबत चर्चा करून लवकरच निर्णय घेईल, असेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

मुंबईच्या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी झोपडपट्टी आहे. दक्षिण मुंबईतील कफ परेडच्या बधवार पार्क इथे ३२ एकर झोपडपट्टी आहे. त्यातील १६ एकरमध्ये ३०० चौरस फुटांचे घर झोपडपट्टीवासीयांना दिले. इतर जागेवर म्हाडा घरे बांधेल आणि विकेल. त्यातून म्हाडाला उत्पन्न मिळेल. अशा ठिकाणी एसआरए आणि म्हाडा एकत्र येऊन संयुक्तपणे घरबांधणीचा प्रकल्प राबवतील असा विचार आहे, असे मंत्री आव्हाड म्हणाले.

बीडीडी चाळ पुनर्विकासाचा शुभारंभ याच महिन्यात
बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ याच महिन्यात होणार आहे. वरळीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. तीन ते चार वर्षांत पुनर्विकसित बीडीडी चाळ नव्या रूपात उभी राहणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here