मुंबई: मुंबईत गुलाबी थंडी परतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर व उपनगरातील तापमानाचा पारा वेगाने घसरत असताना सोबतीला वाराही असल्याने मुंबईकरांना हुडहुडी भरली आहे. आज मुंबईचं किमान तापमान १४.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं आहे. सरासरी तापमानाशी तुलना करता मुंबईतील तापमानाचा पारा किमान ३.३ अंशांनी घसरला आहे.

मुंबईत परतलेल्या थंडीचा जोर आणखी काही दिवस कायम राहणार, असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. मुंबईत उद्या शनिवारीही थंडीचा जोर असेल. ९ फेब्रुवारीनंतर मात्र तापमानात आणखी बदल पाहायला मिळतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी मुंबईतील हवामानात गेल्या दोन दिवसांपासून कशाप्रकारे चढउतार पाहायला मिळत आहे, याबाबतचे दोन ग्राफ ट्विट केले आहेत. यात सांताक्रूझ आणि कुलाबा वेधशाळेने नोंदवलेले तापमान देण्यात आले आहे. मुंबईतील तापमानाचा पारा कसा वेगाने घसरत आहे, हे या ग्राफमध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत तापमानात सातत्याने घसरण होत आहे आणि ही घसरण सुरूच राहील असा अंदाज आहे. मुंबईकरांसाठी हे गुलाबी थंडीचे दिवस आहेत, असे होसाळीकर यांनी म्हटले आहे.

कुलाबा वेधशाळेत आज कमाल तापमान २७.५ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. आज दिवसभर तापमानात चढ-उतार पाहायला मिळाला. त्यामुळे दिवसाही थंडी जाणवत होती. आज सर्वात कमी १०.६ अंश सेल्सिअस इतके तापमान पनवेलमध्ये होते तर पश्चिम उपनगरातील बोरिवलीत ११.३ व पवईत १३.५४ अंश सेल्सिअस इतका तापमानाचा पारा घसरला होता. उत्तरेकडील वाऱ्यामुळेच तापमानात घसरण पाहायला मिळत असून येते काही दिवस असेच हवामान राहणार असल्याचा अंदाज होसाळीकर यांनी व्यक्त केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here