राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेची महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांत वेगवेगळ्या युत्या व आघाड्या होऊ लागल्या आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करणाऱ्या एमआयएम सोबतच अमरावती महानगरपालिकेत शिवसेनेनं युती केल्याने अमरावती विभागात चर्चेला उधाण आले आहे. ( In )
स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का देण्यासाठी शिवसेना, AIMIM, काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी जय्यत तयारी केली होती. एरवी एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणाऱ्या शिवसेना आणि एमआयएमने एकत्र येऊन भाजपविरोधात आखलेली रणनीती चर्चेचा विषय ठरत होती. परंतु, ऐनवेळी झालेल्या नाट्यमय घडामोडींमध्ये भाजपचाच उमेदवार स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर निवडून आला आणि विरोधकांचा डाव फसला. परंतु शिवसेना-एमआयएमची ही युती राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे.
वाचा:
अमरावती महापालिकेत सध्या भाजप सत्तेत आहे. परंतु, महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस, शिवसेना, बसप आणि एमआयएम या पक्षांनी एकत्र येऊन भाजपसमोर आव्हान उभं केलं. ११ मार्चला ही निवडणूक पार पडली. ऐनवेळी स्थायी समितीच्या निवडणुकीत महापालिकेत चांगलंच नाट्य पहायला मिळालं.
भाजपला स्थायी समितीतून बाहेर ठेवण्यासाठी काँग्रेससह शिवसेना, एमआयएम आणि बसपने एकत्र येण्याचं ठरवलं. मात्र, ऐनवेळी बसपचे नगरसेवक चेतन पवार अनुपस्थित राहिले. यावेळी भाजपमधील नाराज नगरसेवक मतदानाला हजर राहणार नाहीत असा सर्वांना अंदाज होता. विरोधकांचा हा अंदाजही चुकला आणि भाजपचे उमेदवार शिरीष रासने ९ मतांसह स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर निवडून आले. अमरावती महापालिकेत भाजपचे ८ नगरसेवक असून स्थानिक पक्षाच्या एका उमेदवाराचाही भाजपला पाठिंबा आहे. त्यामुळे राज्यात सध्या शिवसेना-एमआयएमच्या या फसलेल्या प्रयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे.
वाचा:
या निवडणुकीनंतर भाजपने लगेच शिवसेनेवर निशाणा साधला आहे. हेच का शिवसेनेचं हिंदुत्व? सत्तेत राहण्यासाठी शिवसेना हिंदुत्वाला तिलांजली देण्याचं काम करत असल्याची प्रतिक्रीया भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी दिली. तर अमरावतीच्या महापालिकेत शिवसेनेच्या एकमेव नगरसेविका असलेल्या जयश्री कुरेकर यांनी, ‘भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यापुरते आम्ही एकत्र आला होतो. आम्ही हिंदुत्व विसरलो नाही. भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times