भारताने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ आता प्रथम फलंदाजी करताना किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. कारण पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला १२४ धावांवरच समाधान मानावे लागले होते. त्यामुळे या सामन्यात काय होते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात रोहित शर्माला संधी देण्यात आली नव्हती. त्यानंतर विराट कोहलीवर जोरदार टीका सोशल मीडियावर झाली होती. त्याचबरोबर काही माजी खेळाडूंनीही रोहितला विश्रांती देण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात रोहितला खेळवायला हवे, अशी चाहत्यांची मागणी होती. फिरकीपटू युजवेंद्र चहल गेल्या लढतीत आपला शंभरावा ट्वेन्टी-२० सामना खेळला होता. पण या सामन्यात सर्वाधिक धावा या चहलने दिल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात चहलला संधी मिळणार नसल्याचे म्हटले जात होते.
दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला विश्रांती देण्यात येऊ शकते, असे म्हटले जात होते. कारण पहिल्या सामन्यात शार्दुलला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात शार्दुलच्या जागी कोणाला संधी द्यायची, हा प्रश्न नक्कीच संघ व्यवस्थापनापुढे होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times