पश्चिम बंगाल व इतर राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर आता महाराष्ट्राचा नंबर असं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. त्यावर जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मुनगंटीवार यांचं हे विधान लोकशाही विरोधी आहे. लोकशाही प्रक्रियेनुसार लोकांनी निवडून दिलेले हे सरकार आहे. हे सरकार पाडण्याची भाषा विरोधक करत आहेत. विरोधकांनी सरकार पाडण्याची वल्गना करण्यापेक्षा किमान विरोधक म्हणून तरी काम केलं पाहिजे,’ असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
‘राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून भाजपाचे नेते सातत्याने सरकार पडणार, असं म्हणत आहेत. या अधिवेशनात भाजपा पहिल्यांदाच विरोधी पक्षाप्रमाणे वागताना दिसला. देवेंद्र फडणवीस यांना खात्री झाली आहे की, आपल्याला पुढील साडेतीन वर्षे विरोधी पक्षातच बसायचे आहे. त्यानुसार त्यांनी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडली. हे त्यांनी नेहमी करावं, विरोधी पक्षात बसण्याची सवय फडणवीसांनी अंगवळणी पाडून घेतली पाहिजे,’ असा टोला त्यांनी लगावला आहे. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
‘नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. त्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. पाण्याच्या बाहेर असल्यावर माशाची जशी तडफड होते त्याप्रमाणे नारायण राणे यांची अवस्था झाली आहे. नारायण राणे यांना पुन्हा कधी सत्तेत जाऊन बसतो, असं झालं आहे. त्यामुळे काहीही झालं की ते राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करता. हाच न्याय लावायचा झाल्यास प्रथम उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times