वाचा:
सचिन वाझे प्रकरणाने राज्याच्या पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मुंबई पोलीस दलातील एका अधिकाऱ्याला स्फोटकांप्रकरणी अटक झाल्याने त्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर पावले टाकली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठक सत्रानंतर आज पोलीस दलात तातडीचे आणि महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले. त्यात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. या घडामोडींनंतर विरोधीपक्ष भाजपने अधिक आक्रमक पवित्रा घेतला असून या बदल्या पुरेशा नसल्याचे म्हणत यामागे असणाऱ्या राजकीय शक्तींवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.
वाचा:
भाजपकडून विरोधी पक्षनेते यांनी दिल्लीत तर चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्ले चढवले. केवळ पोलीस आयुक्तांची बदली करून चालणार नाही तर सचिन वाझे यांना ऑपरेट करणारे किंवा त्यांचे राजकीय हँडलर कोण, याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली तर या सर्व प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी पाटील यांनी केली. त्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री व भाजप नेते नारायण राणे यांनी तर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
वाचा:
सचिन वाझे यांना निलंबित असताना खात्यात घेणे, क्राइम ब्रांचमध्ये पोस्टिंग देणे, त्यांना प्रत्येक वेळी संरक्षण देणे, वाझे यांच्यावर कारवाई करण्यात विलंब लावणे, विरोधी पक्षाच्या दबावामुळे वाझे यांच्यावर कारवाई करणे, त्यातच मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली होणे, या सगळ्या घटनाक्रमावर बोट ठेवत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. सचिन वाझे यांचा पूर्वेतिहास पाहता त्यांना पोलीस खात्यात परत घेणे तसेच मनसुख हिरन व अन्य हत्या, या सर्वाला राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार असून नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणीच राणे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times