परमबीर सिंह यांची बदली का करण्यात आली?; असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. यावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परमबीर सिंह यांची बदली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. वाझे प्रकरणामुळं मुंबई पोलिसांची प्रतिमा डागाळली होती, त्यामुळं मुंबई पोलिसांची ती विश्वासार्हता जपण्यासाठी परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
तसंच, राज्यातील करोना परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. बुधवारी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ४५ वर्षांवरील व्यक्तींनाही लसीची मान्यता द्यावी, अशी मागणी केली आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली आहे. तसंच, मुंबईत लॉकडाऊनचा अद्याप कोणाताही निर्णय झाला नसल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. मात्र, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केलं नाही तर कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
म्हणून पोलीस आयुक्तांची उचलबांगडी
मुंबई पोलिसांनी अंबानी बॉम्ब धमकी प्रकरणात अनेक गंभीर चुका केल्या असल्याचे एनआयएच्या चौकशीत पुढे येत येऊ लागल्याने पोलिसांची आणि पर्यायाने महाराष्ट्र सरकारची बदनामी होऊ लागली होती. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत या प्रकरणातील सर्व इत्थंभूत माहिती आधीच पोहोचत असल्याने दिसून आले. पोलिस दलातील अनेक अधिकारी आजही फडणवीस यांच्या संपर्कात असून, त्यांनीच ही माहिती पोहोचवल्याचे दिसून आले. राज्य सरकारची बदनामी होत असताना मुंबईच्या पोलिस प्रमुखांचे यावर कोणतेही नियंत्रण नसल्याने त्यांच्याविरोधातील कारवाईला आणखी बळ मिळाले आणि अखेर मुंबईच्या पोलिस आयुक्तांची उचलबांगडी करण्यात आली, अशी चर्चा आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times