वर्ध्यात थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसूल करणे हे दिवसेदिवस कठीण होऊन बसले आहे. नगरपरिषदेचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी नागरिकांनी ३१ मार्चपूर्वी भरणे बंधनकारक आहे. ही तारीख टळून गेल्यास थकीत रक्कमेवर दरमहा दोन टक्के दंड आकारला जातो. नागरिकांना याबाबत वेळोवेळी सूचना देखील देण्यात येतात. मात्र तरी देखील नागरिक प्रतिसाद देत नाहीत, असा परिषदेचा अनुभव आहे. त्यामुळे थकबाकी त्वरीत न भरल्यास थकबाकीदारांची नळजोडणी त्वरीत खंडीत करण्यात येईल असा इशाराही परिषदेने दिला आहे. मात्र, तरीही अपेक्षित प्रतिसाद येत नसल्याचे पाहून शेवटी परिषदेने आता अशा नागरिकांची नावे सोशल मीडियावर झळकवण्याचा इशारा दिला आहे. इतकेच नाही तर, थकबाकीदारांची नावे विविध चौकात फलकावर लिहून प्रसिध्द करण्याचा इशाराही परिषदेने दिला आहे.
अशा नागरिकांना प्रथम स्थावर मालमत्ता जप्त करण्याची प्रथम नोटीस देण्यात येईल असे परिषदेने जाहीर केले आहे. ही नोटीस दिल्यानंतर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल. ही कारवाई परिषदेच्या धडक कर वसूली पथकामार्फत करण्यात येणार आहे. यानंतर जप्त केलेल्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्यात येईल असे परिषदेने म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
या लिलावाच्या रक्कमेतून मालमत्ता कर वसूल करण्याचा परिषदेचा प्रयत्न असणार आहे. ज्या मालमत्ताधारकांकडे खुला भूखंड असेल आणि त्याने कर थकवला असेल, तर अशा मालमत्ताधारकाच्या रिकाम्या जागेवर ‘ही नगरपरिषदेची मालमत्ता आहे’ असा फलक लावण्यात येईल आणि तो भूखंड जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल असे परिषदेने बजावले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
वर्धा नगरपरिषदेने कर वसुली करण्यासाठी एकूण ९ करवसुली पथके नेमली आहेत. थकबाकी असलेल्या नागरिकांनी ३१ मार्चपूर्वी कर भरणा करावा आणि आपल्या विरोधातील कारवाई टाळावी, असे कळकळीचे आवाहनही शेवटी वर्धा नगरपरिषदने केले आहे. करवसूली पथकांना थकबाकीदारांनी सहकार्य करावे अशी विनंतीही परिषदेने केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times