सचिन वाझे प्रकरणावरून राज्य सरकारला विधिमंडळात व बाहेरही अडचणींना सामोरं जावं लागत आहे. याच प्रकरणी सरकारनं पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याही केल्या आहेत. तरीही हे प्रकरण शांत होताना दिसत नाही. विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्या मागचा सूत्रधार शोधण्याची मागणी केली आहे. तसंच, मनसुख हिरन मृत्यू प्रकरणाचा तपासही एनआयएनं करावा, अशी मागणी केली आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेनं फडणवीसांच्या या मागणीचा समाचार घेतला आहे. तसंच, ‘एनआयए’वरही निशाणा साधला आहे.
वाचा:
‘मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असतानाच ‘एनआयए’ने घाईगडबडीत अँटिलिया स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास हाती घेतला. महाराष्ट्र सरकारला कुठे बदनाम करता आले तर पाहावे यापेक्षा वेगळा ‘उदात्त’ हेतू त्यामागे नसावा. गुन्हे शाखेतील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या भोवतीच हे प्रकरण फिरत आहे व त्यामागचा हेतू लवकरच समोर येईल. कोणत्याही परिस्थितीत यामागे दहशतवादाच्या तारा जुळलेल्या नसताना या गुन्ह्याच्या तपासासाठी ‘एनआयए’ने घुसावे हा काय प्रकार आहे? मुंबईतील वीस जिलेटिन कांड्या हा ‘एनआयए’साठी मोठाच आव्हानाचा विषय ठरताना दिसत आहे,’ असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे.
वाचा:
‘मनसुख हिरेन याच्या संशयास्पद मृत्यूचे भाजपला जरा जास्तच दुःख झाले आहे, पण याच पक्षाचे एक खासदार रामस्वरूप शर्मा यांचा संसदेचे अधिवेशन सुरू असताना दिल्लीत संशयास्पद मृत्यू झाला आहे. शर्मा हे प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे होते. त्यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल भाजपवाले छाती बडवताना दिसत नाहीत. मोहन डेलकरांच्या आत्महत्येबाबत तर कोणी चकार शब्द काढायला तयार नाही. सुशांतसिंह राजपूत व त्याच्या कुटुंबीयांना तर सगळेच विसरून गेले आहेत. एखाद्याच्या मृत्यूचे भांडवल कसे करायचे हे सध्याच्या विरोधी पक्षाकडूनच शिकायला हवे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times