भारतीय संघात पहिला बदल लोकेश राहुलचा होऊ शकतो. कारण आतापर्यंत चारही ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये राहुलला संधी दिली आहे. या चारही सामन्यांमध्ये राहुल हा अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे या निर्णायक सामन्यात राहुलला संघाबाहेर करण्यात येऊ शकते. गेल्या सामन्यात राहुलला संघात कायम ठेवत इशान किशनला बाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे यावेळी जर राहुलला संघातून बाहेर काढले तर इशान किशन हा भारतासमोर पहिला पर्याय असेल. पण जर इशान जर या सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकला नाही. तर राहुलला संघात कायम ठेवण्यात येऊ शकते किंवा विश्वचषकाच्या संघबांधणीचा विचार करता यावेळी शिखर धवनलाही संधी देण्यात येऊ शकते. कारण या मालिकेत फक्त एकाच सामन्यात धवनला संधी देण्यात आली आहे.
भारताच्या मधल्या फळीत मात्र कोणता बदल होईल, असे सध्याच्या घडीला तरी दिसत नाही. कारण सूर्यकुमार यादवने चौथ्या सामन्यात झुंजार अर्धशतक झशकावले होते. त्यामुळे त्याला यावेळी संघात कायम ठेवले जाईल. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहली, रिषभ पंत, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पंड्या यांनाही पाचव्या सामन्यासाठी संघात कायम ठेवण्यात येऊ शकते.
भारताच्या गोलंदाजीमध्ये एक बदल केला जाऊ शकतो. कारण आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. पण त्याचबरोबर फिरकी गोलंदाजांनी जास्त धावा दिल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी संघातील एका फिरकीपटूला वगळून वेगवान गोलंदाजाला संधी देण्यात येऊ शकते. टी. नटराजन पूर्णपणे फिट झाला असून त्याच्या नावाचा विचार नक्कीच पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्याच्या संघ निवडीसाठी केला जाऊ शकतो. त्याचबरोबर संघात दीपक चहर हादेखील एक वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे पाचव्या सामन्यासाठी नेमकी कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times