मुंबई: ‘सत्ता गेली की अक्कल जाते, अक्कल गेली की भांडवल जाते, भांडवल गेले की कुंपणावरचे कावळे उडून जातात. याचा अनुभव सध्या भाजप घेत आहे. सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी आहे. यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील,’ असा सणसणीत टोला शिवसेनेनं भाजपला हाणला आहे. (Shiv Sena on Jalgaon Mayoral Election Results)

वाचा:

सांगली पाठोपाठ जळगाव महापालिकेची सत्ता भाजपनं गमावली आहे. भाजपचे नगरसेवक फुटल्यानं हे सत्तापरिवर्तन झाले आहे. ‘सामना’च्या अग्रलेखात या निकालांवर भाष्य करताना शिवसेनेनं भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. ‘भाजपचा फुगा एकापाठोपाठ एक फुटू लागला आहे. महाराष्ट्रात भाजपला तात्पुरती सूज मधल्या काळात आली होती. ही सूज म्हणजे पक्षाची वाढ आहे असा गैरसमज काही मंडळीनी करून घेतला. त्यातून अहंकाराचे वारे भाजप नेत्यांच्या कानात शिरले. त्या अहंकाराचा पाडाव जळगावात झाला,’ असं निरीक्षण शिवसेनेनं नोंदवलं आहे. यांनी त्यांच्या राजकारणाची, तसेच जळगाववरील वर्चस्वाची चुणूक दाखवली आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं खडसेंचं कौतुकही केलं आहे.

वाचा:

‘महाराष्ट्रात भाजपची सत्ता पाच वर्षे होती. त्या सत्तेतून पैसा व पैशांतून सर्व स्तरांवरील सत्ता विकत घेण्यात आल्या. पैसे फेकले की सर्व विकत मिळते हा नवा सिद्धांत भाजपनं रुजवला. पण महाराष्ट्रात १०५ आमदार निवडून येऊनही भाजपला राज्याची सत्ता मिळवता आली नाही. सत्ता गेली की अक्कल जाते, अक्कल गेली की भांडवल जाते, भांडवल गेले की कुंपणावरचे कावळे उडून जातात. याचा अनुभव सध्या भाजप घेत आहे. त्यातून त्यांना शहाणपण आले तर उत्तमच,’ असा चिमटा शिवसेनेनं काढला आहे.

लोकांच्या मनातले भय नष्ट झालेय!

महाराष्ट्रात ‘ठाकरे सरकार’ आल्यापासून येथील लोकांच्या मनातले भय नष्ट झाले. त्यामुळे लोक निर्भय बनून मतदान करीत आहेत. ई.डी., आयकर विभागाचे भय सामान्य माणसांना असण्याचे कारण नाही. आतापर्यंत हे भय दाखवूनच भाजपने राजकीय स्वार्थ पाहिला. पोलीस यंत्रणेचा वापर करून ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंतच्या निवडणुका जिंकल्या. ते भयच आता उरले नसल्याने लोक मुक्तपणे संचार करू लागले आहेत,’ असा दावा शिवसेनेनं केला आहे. ‘शेवटी सत्ता हेच हत्यार असते व सत्ता हीच संकटमोचक, कवचकुंडले ठरतात. बाकी सारे अहंकार, गर्व व्यर्थ ठरतात. वाऱ्यावरची वरात वाऱ्याच्या झुळकीबरोबरच नष्ट होते. घाऊक पक्षांतरे करून भाजपनं महाराष्ट्रात पक्ष उबदार व गुबगुबीत केला, पण त्याचा पाया भक्कम नव्हता हे आता दिसून आलं. आता महाविकास आघाडीकडे बोट दाखवून आदळआपट करण्याची गरज नाही. सांगली, जळगावातील सत्ताबदलाला फार मोठे नैतिक अधिष्ठान नसले तरी नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार भाजपनं गमावला आहे,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here