अनिल देशमुख यांच्यावर आरोप करताना परमबीर सिंह यांनी ‘व्हॉट्सअॅप चॅट’चा मजकूर जाहीर केला होता. तसंच, कोणते पोलीस अधिकारी देशमुख यांना, कोणत्या दिवशी भेटले याची माहिती देखील दिली होती. सचिन वाझे, संजय पाटील हे अधिकारी गृहमंत्र्यांना भेटल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची जी तारीख त्यांनी नमूद केली आहे, ती संशय निर्माण करणारी असल्याचं मेडिकल रेकॉर्डवरून समोर आलं आहे.
वाचा:
परमबीर सिंह यांच्या म्हणण्यानुसार, अनिल देशमुख यांनी वाझेंना मुंबईतील ‘ज्ञानेश्वरी’ बंगल्यात भेटायला बोलावलं होतं. मात्र, ज्या दिवशी वाझे आणि देशमुख यांची भेट झाल्याचा दावा परमबीर यांनी केलाय, त्या दिवशी अनिल देशमुख हे मुंबईत नव्हते. ते नागपूरमध्ये होते आणि तिथं करोनावर उपचार घेत होते. रुग्णालयाच्या कागदपत्रांतूनच ते समोर आलं आहे. त्यामुळं परमबीर सिंह यांच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
देशमुखांनी याआधीच फेटाळले आहेत आरोप
अनिल देशमुख यांनी यांचे आरोप आधीच फेटाळून लावले आहेत. ‘सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे. ‘सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही? १७ मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर सिंग यांनी १६ मार्चला एसीपी पाटील यांना व्हॉटसअप chat वरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. यातून सिंग यांना पद्धतशीरपणे पुरावे जमा करायचे होते, असे दिसते. पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. १६ वर्षे निलंबित असलेल्या वझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला.
परमबीर सिंग यांनी आपले आरोप सिद्ध करावेत, असं आव्हानही देशमुख यांनी दिलं आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times