शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे संजीवनी होते. या संजीवनमुळेच भाजप मोठा झाला, असा टोलाही जाधव यांनी भाजपला लगावला आहे. भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही ही त्यांची दुखरी नस आहे आणि ती खदखद देखील आहे. जर महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालले तर सन २०२४ मध्ये देशात भाजप सरकार दिसणार नाही हे भाजपला माहीत आहे. बाळासाहेब ठाकरे नावाच्या संजीवनीमुळेच भाजप मोठा झाला. ज्या झाडावर तुम्ही वाढलात ते झाडच खायला निघालात. त्यामुळे नियती मात्र कोणालाच सोडत नाही, असे जाधव यांनी म्हटले आहे.
नैतिकतेचे धडे भाजपने आम्हाला देऊ नयेत. गुजरात राज्याचे गृहमंत्री असताना अमित शहा यांच्यावर त्यावेळचे पोलिस दलाचे प्रमुख डी. जी. वंजारी यांनी आरोप केले होते. त्यावेळी अमित शहा यांनी राजीनामा दिला होता का?, असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला आहे. मोहन डेलकर यांना आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीत काही नावं आहेत. त्याचे काय झाले? हे पाहता असे म्हणता येते की भाजपला नैतिकतेच्या गोष्टी तोंडातून बोलता येतात, पण प्रत्यक्षात मात्र भाजपने नैतिकता कधीही पाळलेली नाही, असे टीकास्त्र भास्कर जाधव यांनी भाजपवर सोडले आहे.
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील केंद्र सरकार राज्य सरकारच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाचा अर्थात एटीएसचा तपास पूर्ण होत आला असताना देखील हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे अर्थात एनआयएकडे दिला गेला, यातून हेच स्पष्ट होत असल्याचे जाधव म्हणाले.
खरे तर नैतिकता काय असते हे दाखवण्याचे काम महाविकास आघाडीने केले आहे. तुम्ही बोट दाखवायचे आणि त्याला बाहेर काढायचे ही तुमची नैतिकता आम्हाला मान्य नाही, असे जाधव म्हणाले. परमबीर सिंग यांच्या पत्रावर शंका उपस्थित करण्यात आली आहे. मग तरी अजूनही या साऱ्या प्रकरणाचा खुलासा त्यांनी का केला नाही?, असा सवालही त्यांनी विचारला आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीतून मुंबईत आले आणि त्यानंतरच हे पत्र कसे काय पुढे आले?, असा प्रश्न विचारतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच आपली भूमिका मांडतील अशी माहितीही भास्कर जाधव यांनी दिली आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times