मुंबई: मनसुख हिरन मृत्य प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसमार्फत करण्यात येत आहे. पथकाने आता दमणमध्ये कारवाई करून व्होल्वो कार जप्त केली आहे. तत्पूर्वी, वाझे प्रकरणात पाच कार जप्त करण्यात आल्या होत्या. ही जप्त केलेली सहावी कार आहे. मनसुख यांच्या हत्येसाठी या कारचा वापर झाल्याचा संशय आहे. त्या दिशेने तपास सुरू आहे.

मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन माहिती उघड होत आहे. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला असला तरी, महाराष्ट्र एटीएसकडूनही तपास सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून एटीएसने दमणमध्ये कारवाई करून या प्रकरणाशी संबंधित व्होल्वो कार जप्त केली आहे. मनसुख यांच्या हत्येसाठी या कारचा वापर करण्यात आल्याचा संशय पथकाला आहे. जप्त करण्यात आलेली व्होल्वो कार एटीएसच्या ठाणे येथील कार्यालयात ठेवण्यात आली आहे. वाझे प्रकरणात जप्त केलेली ही सहावी कार आहे. याआधी या प्रकरणाशी संबंधित स्कॉर्पिओ, इनोव्हा, दोन मर्सिडीज, प्रॅडो या कार जप्त केल्या आहेत.

धक्कादायक माहिती उघड

अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात दररोज नवनवीन माहिती उघड होत आहे. सचिन वाझे यांचेही कारनामे समोर येत आहेत. एका प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. तर मनसुख मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडूनही सुरू आहे. विक्रोळी पोलीस ठाण्यात कारचोरीची तक्रार केल्यानंतर मनसुख आणि त्यांचा भाऊ विनोद यांच्यामध्ये संभाषण झाले होते. ते संभाषण आता समोर आले आहे. सचिन वाझे कार वापरत होते, असे पोलिसांना सांगितले का? असे विनोदने मनसुख यांना विचारल्याचे संभाषणात दिसून आले आहे. त्यानंतर मनसुख यांनी विनोद यांना ‘नाही सांगितले’ असे उत्तर दिले. तसेच हे सर्व प्रकरण माझ्याकडे येणार आहे, काळजी करू नका, असे वाझे म्हणाल्याचेही मनसुख यांनी संदेशातून सांगितले. दोन्ही भावंडांमध्ये संदेशाच्या माध्यमातून झालेले संभाषण आणि मनसुख यांचे वाझेंसोबतचे व्हॉट्सअॅप कॉल याआधारे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी मनसुखच्या हत्येमध्ये नरेश गोर आणि विनायक शिंदे या दोघांचा सहभाग असल्याचे शोधून काढले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here