वाचा:
महाराष्ट्र पोलीस दलात बदल्यांचे मोठे रॅकेट सक्रिय आहे. त्याबाबत पुरावे देऊनही ठाकरे सरकारनं त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यामुळं आपण केंद्रीय सचिवांकडे तक्रार करणार असून सीबीआय चौकशीची मागणी करणार आहोत, असं आज फडणवीस यांनी जाहीर केलं. हे आरोप करताना त्यांनी गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा आधार घेतला होता. फडणवीस यांच्या या आरोपांचा नवाब मलिक यांनी जोरदार समाचार घेतला. ‘राजकीय लढाईत दोन हात करता येत नाहीत हे लक्षात आल्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून राज्य सरकारला बदनाम करण्याचे प्रयत्न फडणवीस करत आहेत. त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केलेले दोन्ही दावे साफ खोटे आहेत. अनिल देशमुख क्वारंटाइन असताना सह्याद्री किंवा मंत्रालयात कुठेही गेले नव्हते,’ असं मलिक यांनी सुरुवातीला स्पष्ट केलं.
वाचा:
फडणवीस यांच्या बदल्यांच्या रॅकेटच्या आरोपांबद्दल बोलताना मलिक यांनी अनेक गौप्यस्फोट केले. ‘बदल्यांच्या संदर्भात फडणवीसांनी केलेला आरोप साफ चुकीचा आहे. रश्मी शुक्ला यांनी केलेलं फोन टॅपिंग बेकायदा होतं. त्यामुळंच शिक्षा म्हणून नवीन पद करून त्यांना तिथं बसवण्यात आलं. महाविकास आघाडीचं सरकार बनत असतानाही महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप करण्याचा उद्योग रश्मी शुक्ला यांनी केला होता. जे दोन अधिकारी आता दिल्लीत गेलेत, ते फडणवीसांच्या काळात भाजपसाठी काम करत होते,’ असा आरोप मलिक यांनी केला.
वाचा:
यांच्या प्रतिनियुक्तीबाबत बोलताना मलिक म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर येताच जयस्वाल यांना दिल्ली पोलीस आयुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, आमच्या सरकारला त्यांच्याबद्दल कुठलाही आकस नव्हता. त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची गरज आहे असं आम्ही तेव्हा केंद्राला सांगितलं होतं. पण ते भाजपसाठी काम करत होते हे आता स्पष्ट झालंय. याच अधिकाऱ्यांच्या आडून आमच्या गृहमंत्र्यावर आरोप केले जात आहेत.’
वाचा:
याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर दबाव आणला होता. तेव्हा अॅडव्होकेट जनरलचं मत मागवून मी तसं करण्यास नकार दिला होता, असा आरोप काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी केला होता. मलिक यांनी या आरोपातील हवा काढून टाकली. ‘फडणवीस यांनी वाझेच्या बाबतीत अॅडव्होकेट जनरलचं मत मागवल्याचा कुठलाही पुरावा किंवा कागदपत्र गृह विभागाकडे नाही. पहिल्या दिवसापासून ते महाराष्ट्राची दिशाभूल करताहेत,’ असं मलिक म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times