अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा तसेच उत्पन्न वाढ वेगाने वाढण्याचा काळ हा मिड आणि स्मॉल कॅप फंडांमध्ये गुंतवणुकीसाठी अतिशय अचुक असतो. मिड आणि स्मॉल कॅप हे लार्ज कॅपच्या तुलनेत निराशाजनक आणि दिमाखदार कामगिरी अशा चक्रातून सतत वाटचाल करत असतात. दर ३ ते ४ वर्ष निराशानजक कामगिरी केल्यानंतर शेअरबाजारात मिड आणि स्मॉल कॅप प्रकार आपल्याला अतुलनीय कामगिरी करताना दिसतो. आत्तापर्यंत २००३, २००८ आणि २०१३ मध्ये मिड आणि स्मॉल कॅपमधील समभाग हे अतिशय आकर्षक किंमतीला उपलब्ध होते आणि सद्यस्थितीत मिड आणि स्मॉल कॅप फंडात अतिशय आकर्षक किंमतीला गुंतवणूक करण्यास हे क्षेत्र अतिशय उत्तम संधी देत आहे.
लार्ज कॅप आणि मिड-स्मॉल कॅपच्या मुल्यातील फरक हा गुंतवणूकदारांना स्मॉल आणि मिडकॅप फंडात गुंतवणुकीसाठी लक्षणीय संधी देत असून लॉर्ज कॅपच्या तुलनेत लक्षणीय अल्फा परतावा म्हणजेच घसघशीत परतावा मिळवता येईल. ऑक्टोबर २०१९ पासून या क्षेत्राबाबत आमची अतिशय तेजीची धारणा असून गेल्या काही महिन्यात मिड आणि स्मॉल कॅप समभागांनी शेअरबाजारात अतिशय जोरदार कामगिरी सुरु केली असून ही कामगिरी पुढील काही वर्ष अशीच सुरु राहील, असा आमचा अंदाज असल्याची टिप्पणी आयटीआय म्युच्यूअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य गुंतवणुक अधिकारी जॉर्ज हेबेर जोसेफ यांनी केली आहे.
आत्तापर्यंत आयटीआय म्युच्यूअल फंडाने आयटीआय मल्टी कॅप फंड, आयटीआय लाँग टर्म इक्विटी फंड ( ईएलएसएस-कर बचत फंड), आयटीआय आरबीट्राज फंड, आयटीआय लिक्वीड फंड, आयटीआय ओव्हरनाईट फंड, आयटीआय बॅलन्स्ड अॅडव्हँटेज फंड, आयटीआय स्मॉल कॅप फंड, आयटीआय बॅकिंग अॅण्ड पीएसयू डेट फंड, आयटीआय लार्ज कॅप फंड आणि आयटीआय मिड कॅप हे दहा म्युच्यूअल फंड बाजारात उतरविलेले आहेत. आयटीआय मिड कॅप फंड हा दहावा फंड असून नुकताच तो बाजारात आला असून त्याला जोरदार प्रतिसाद लाभला आहे. गुंतवणुकीचे एसक्युएल हे आगळेवेगळे तंत्र, गुंतवणूकदारांशी पारदर्शक संवाद आणि भारतातील आमच्या भागीदारांशी आमचे नजीकचे संबंध यामुळे बाजारात आम्हाला घट्टपणे पाय रोवता आले आहे, असे जॉर्ज जोसेफ यांनी सांगितले.
समभाग खरेदीच्यावेळी अॅम्फीने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार मिडकॅपवरच भर दिला जात आहे. पोर्टफोलिओचा ८० टक्के भाग हा प्रमुख समभागांचा मिळून राहणार असुन बेट घेत अंदाजाआधारे केलेली गुंतवणूक ही २० टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही. सातत्यपुर्ण परतावा मिळविणे आणि सर्व गुंतवणूकदारांना गुंतवणूकीचा उत्तम अनुभव मिळून देणे हे या फंडाचे उद्दीष्ट आहे. देशाची अर्थव्यवस्था २०१० पासून मंदीतून वाटचाल करत आहे. सरकारने रेरा, जीएसटी, करकपातीसारखे केलेल्या काही धोरणात्मक सुधारणांचा वर्तमानकाळात अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असला तरी दीर्घ कालावधीच्या दृष्टीकोनातून हे उपाय अधिक सकारात्मक राहणार आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times