वाचा:
मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. अँटिलिया समोर ठेवलेल्या स्फोटकांपासून ते सचिन वाझेची अटक व नंतर परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांपैकी कुठल्याही प्रकरणावर अजित पवार यांनी अद्याप काहीही भाष्य केलं नव्हतं. आज प्रथमच त्यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली. अनिल देशमुख यांच्या संदर्भात पत्रकारांनी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं एक पत्र कालच ट्वीट केलं होतं. परमबीर यांनी आपल्यावर केलेल्या आरोप खोटे आहेत. सरकारनं याची चौकशी करून ‘दूध का दूध, पानी का पानी’ करावं, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
वाचा:
देशमुख यांच्या या पत्राच्या अनुषंगानं अजित पवारांना पत्रकारांनी विचारलं. सरकार चौकशीचा निर्णय घेणार का आणि तसा निर्णय घेतल्यास देशमुख यांचं मंत्रिपद जाणार का? असं विचारलं असता अजित पवार म्हणाले, ‘हे आरोप गंभीर आहेत यात शंका नाही. त्याबद्दल अनिल देशमुखांना जे काही सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलंय. माझ्यासह बाळासाहेब थोरात, नाना पटोले, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे अशा सर्वच सहकाऱ्यांनी आपली भूमिका मुख्यमंत्र्यांपुढं मांडलीय. आता त्यावर मुख्यमंत्री अंतिम निर्णय काय घेतात हे कळेलच. ते मला विचारून निर्णय घेणार नाहीत. मात्र, त्यांचा जो काही निर्णय असेल, त्यामागे आम्ही सगळे राहू.’
सरकारला पूर्ण बहुमत
राष्ट्रपती राजवटीच्या विरोधकांच्या मागणीला अर्थ नसल्याचं अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं. ‘राज्यात कायदा-सुव्यवस्था उत्तम आहे. पोलीस खात्यातील काही लोकांनी गंभीर चुका केल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई होईल. अधिवेशनाच्या कालावधीबाबत म्हणाल तर केंद्र सरकारनंही करोनामुळं अधिवेशनाचा कालावधी कमी केला आहे. अन्य राज्यांतही काहीशी अशीच परिस्थिती आहे. सरकारच्या भवितव्याची चिंता करण्याची गरज नाही. सरकारला पूर्ण बहुमत आहे. सगळे आमदार सरकारच्या पाठीशी आहेत,’ असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times