वाचा:
चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्यांचे निराकरण व्हावे म्हणून शुक्रवारी वीज वितरणच्या जळगाव एमआयडीसीतील मुख्य कार्यालयात धडक दिली. यावेळी आक्रमक होत आमदार मंगेश चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यांच्यासोबत अनेक शेतकऱ्यांनी आपल्या समस्या यावेळी मांडल्या. मात्र अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण कारवाई करत असल्याचे उत्तर दिले. त्यामुळे शेतकरी अधिक संतप्त झाले.
वाचा:
चाळीसगाव तालुक्यात गेल्या आठ दिवसांत तब्बल सात हजार वीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत. याबाबत जाब विचारला असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आमदारांसह संतप्त शेतकऱ्यांनी अधीक्षक अभियंता शेख यांना दोरीने खुर्चीला बांधले व त्याच अवस्थेत केबिनमधून मुख्य कार्यालयाच्या आवारात आणले. वेळीच एमआयडीसी पोलिसांनी हस्तक्षेप करत अधीक्षक अभियंता शेख यांची सुटका केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांना अटक केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
वाचा:
मिरविण्यासाठी आमदार झालो नाही: मंगेश चव्हाण
मंगेश चव्हाण यांनी याबाबत एक फेसबुक पोस्टही लिहिली आहे. त्यात त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. ‘मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मिरविण्यासाठी आमदार झालो नाही तर सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आमदार झालो आहे. शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, यासाठी मी अनेकदा अधीक्षक अभियंता यांना लेखी सूचना केल्या मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. चालू तीन महिन्यांचे बिल भरण्याचे कारण सांगून शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडण्यात आल्या, जेव्हा शेतकरी बिल भरायला गेले तेव्हा मात्र मागील १० वर्षांची थकबाकी भरा म्हणून अधिकारी सांगतात. मागील २ वर्षांपासून शेतकऱ्यांना उत्पन्न नाही. त्यात यावर्षी गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे पीक जमीनदोस्त झाले. मी गेले चार दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देत आहे. त्यात वीज कनेक्शन कट केल्याने काढणीसाठी आलेल्या पिकांना पाणी देता येत नाही, दुभत्या जनावरांना प्यायला पाणी नाही, अशी सर्व विदारक परिस्थिती असताना मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शांत राहणे शक्य नव्हते. म्हणूनच विविध संकटांच्या जोखडात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या कथा आणि व्यथा मांडण्यासाठी वीज वितरण कंपनीचा व सरकारचा निषेध म्हणून जळगावचे अधीक्षक अभियंता यांना चपलांचा हार घालून त्यांना दोरीने बांधले. शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्काळ थांबविण्यात यावी व तालुक्यातील ७ हजार शेतीपंप कनेक्शन तात्काळ जोडावी, अशी आमची मागणी आहे अन्यथा मला लोकप्रतिनिधी या नात्याने तीव्र स्वरूपाचे आंदोलन शेतकऱ्यांना सोबत घेऊन करावे लागेल, असा इशारा यानिमित्ताने देतो’, असे चव्हाण यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times