विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा संदर्भ देऊन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यासंदर्भात अहवाल जारी केला आहे. मात्र, या अहवालावर भाजपनं प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘रश्मी शुक्ला यांच्या अहवालामुळं ठाकरे सरकारची चांगलीच तंतरली आहे. खंडणीखोरीचं बिंग फुटलं आहे. अहवालात काहीच नाही, असे सरकारचे म्हणणे असेल तर त्यांनी अहवाल जनतेसमोर ठेवावा. अहवाल गुलदस्त्यात ठेवून दूध का दूध और पाणी का पाणी कसे होईल?,’ अशी टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.
तसंच, ‘रश्मी शुक्ला यांनी तयार केलेला टॉप सिक्रेट रिपोर्ट मी फोडला नाही, तो देवेंद्र फडणवीस यांनीच फोडला. असं आता घाबरुन नबाव मलिक म्हणत आहेत. नवाब मलिक जर रिपोर्ट फोडला म्हणतात तर घाबरता कशाला? आम्हीतर तेव्हाच सांगितलं आहे की, आमच्यावर कारवाई करा फोडला म्हणून, गुन्हा दाखल करा. तुम्ही आता कशाला एवढं घाबरत आहात? अगोदर रिपोर्ट पब्लिश तर करा. रिपोर्टमध्ये काही दम नाही तर रिपोर्ट पब्लिश करा आणि रिपोर्टप्रमाणे कारवाई करा. पण स्वत:च्या खंडण्या व स्वत:चा भ्रष्टाचार लपवायचा यामुळं अशाप्रकारची वक्तव्य नवाब मलिक व राष्ट्रवादी करते आहे. तुमच्या पायाखालची आता वाळू सरकली आहे, हेच तुमच्या या घाबरट वक्तव्यांवरुन सिद्ध होत आहे,’ असंही भातखळकर म्हणाले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times