राज्यात अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारच्या गाइडलाइन्सला अनुसरून वेळोवेळी त्यात बदल करण्यात आला आहे. मात्र, राज्यात करोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पुन्हा काही निर्बंध कडक करण्यात आले आहेत. तर, राज्यात २८ मार्चपासून रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. त्यामुळं राज्य सरकारने लॉकडाउन संदर्भात नव्याने गाइडलाइन जारी केल्या आहेत. या लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील वाढत्या करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्याने गाईडलाईन जारी केल्या आहेत. त्यानुसार आज रात्री ८ वाजल्यापासून ते पहाटे ७ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच चौपाट्या, उद्याने, मॉल, सिनेमागृह यासाठीही सरकारने अनेक निर्बंध घातले असून सर्व प्रकारच्या कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे.
तसंच, आदेशानुसार विना मास्क फिरणाऱ्यांकडून दंड आकारण्यात येणार आहे. तसंच, बाहेर ६ फुटांचं अंतर राखणं गरजेच आहे, गर्दीच्या ठिकाणी थुंकल्यास दंड वसुल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, खासगी कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, असंही या आदेशात नमूद केलं आहे.
राज्यात आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळं रात्री आठ ते सकाळी सातच्या कालावधीत पाच पेक्षा अधिक लोकं गोळा झाल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. तसंच, १ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. २७ मार्चच्या मध्यरात्रीपासून रात्री ८ ते सकाळी सात पर्यंत बगीचे, चौपाट्या यासारख्या सार्वजनिक ठिकाणं बंद राहणार आहे.
सर्व सिनेमाहॉल व मल्टिप्लॅक्स, मॉल्स, रेस्टॉरंट देखील रात्री ८ ते सकाळी सातपर्यंत बंद राहणार आहेत. रेस्टॉरंटच्या होम डिलिव्हरी आधी दिलेल्या आदेशानुसार सुरु राहणार आहेत. राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभासाठी फक्त ५० जणांना परवानगी देण्यात आली आहे. तर, अंत्यविधीसाठी २० जणांना परवानगी देण्यात आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times