फेब्रुवारी महिन्यापासून करोनाने पुन्हा तोंड वर काढले आहे. आता वाढत असलेली करोना रुग्णसंख्या व शासनाकडून आलेले निर्बंध यामुळे विविध उत्सव व सणावर पाणी फेरले गेले आहे. करोनामुळे संक्रांत, प्रजासत्ताक दिन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महाशिवरात्री व इतर कार्यक्रमांना ब्रेक लागला होता. तसेच होळीसह धुलीवंदन, गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती उत्सव साधेपणाने साजरे करावे लागणार आहेत.
होळी सण म्हटले की रंगाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला जातो. मात्र, कोरोना संकटाचा ससेमीरा सोडत नसल्याने या आनंदावर विरजण पडले आहे. जिल्ह्यासह राज्यात कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. मार्च महिन्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, याचा परिणाम सणावर झाला आहे. मागील वर्षी ९ मार्चला होळी व १० मार्चला रंगाची होळी (धुलीवंदन) होते. मात्र, गतवर्षी होळी सणानंतर २२ मार्च पासून लॉकडाऊन झाल्यामुळे काही प्रमाणात होळी सण साजरा करता आला होता. आता करोना संकट असल्याने होळी सण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शासनाने सर्वत्र सणावर बंधन घातल्याने यावर्षी होळीचा रंग फिका पडणार आहे. होळी चांगली होईल अशी सर्वांना आशा असताना करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे बाजारपेठेत सुद्धा रंगाची दुकाने विरळच दिसून येत आहे. नाहीतर आठवडाभरापासून रंगाची दुकाने, मुखवटे, वेगवेगळे आकर्षक पिचकारी व विविध रंग असलेली दुकाने लागलेली असायची. मात्र, होळी सणावर करोनाचे वीघ्न असल्याने रंग विक्रेते फारसे गंभीर दिसत नाहीत. याउलट मोठ्या दुकानदारांनी रंगाची खरेदी सुद्धा केली नसल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times