मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. ‘मुळात पवार आणि शहा यांची भेट झाली की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. मला तरी त्याची माहिती नाही. तशी भेट झाली असेल तर त्यात चुकीचं काही नाही. देशाच्या गृहमंत्र्यांना संसदेचे सदस्य किंवा एखादा मोठा नेते भेटतो यात वावगं काय आहे,’ असा प्रश्न संजय राऊत यांनी केला आहे.
‘काही कामानिमित्त दोन्ही नेत्यांची भेट झाली असेल तर त्यात चुकीचं काहीच नाही. आम्ही देखील गृहमंत्र्यांना भेटू शकतो. राजकारणात कोणतीही बैठक गुप्त नसते. तुमच्यापर्यंत बातमी आली मग बैठक गुप्त कशी? फक्त प्रत्येक गोष्ट जाहीरपणे सांगितली जातेच असं नाही. त्या गोष्टी नंतर सार्वजनिक होतात. जशी बंद खोलीतली चर्चा सार्वजनिक झाली,’ असा चिमटा राऊत यांनी काढला. ‘महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. पूर्ण ताकदीनं काम करत आहे. या सरकारला अजिबात धोका नाही. टीका-टिप्पणी होत असते. शेवटी राजकारण थोडं हलतडुलत राहिलं पाहिजे, लोकशाही आहे,’ असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
वाचा:
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कालच या वृत्तावर खुलासा करण्यात आला होता. ‘पवार-शहा भेटीच्या अफवा भाजपकडून पसरवल्या जात आहेत. अशी कुठलीही भेट झालेली नाही. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल अहमदाबादेतील कार्यक्रमातून थेट मुंबईत परतले होते, असं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times