दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी भारत भालकेंसारखा पेहराव करून राष्ट्रवादीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावरून पंढरपूरची ही पोटनिवडणूक भावनिक मुद्द्यावरच लढवली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यावेळी बोलताना भगीरथ यांनी, ‘आज नाना आपल्यात नाहीत हे माझं कौटुंबिक दु:ख आहेच पण ज्या जनतेने नानांवर मनापासून जीवापाड प्रेम केलं त्यांना यापुढेही नानांच्या विचारांची गरज आहे. म्हणूनच निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. माझा फक्त देह आहे बाकी माझ्या नसा-नसांत नानाचे रक्त आहे, असं भावनिक वक्तव्य भगीरथ यांनी यावेळी केले.
यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्रणिती शिंदे,आमदार संजय शिंदे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
तर दुसरीकडे स्थानिक मुद्द्यांवर मोर्चेबांधणी करणाऱ्या समाधान आवताडे यांनी, ‘या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आव्हान वाटत नाही. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल असा दावा केला आहे. समाधान आवताडे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, प्रशांत परिचारक, राम शिंदे, सुभाष देशमुख, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि सोलापूरचे खासदार डॉ जयसिद्धयेश्वर शिवाचार्य महास्वामी उपस्थित होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times