पंतप्रधान मोदींनी गुरुवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेत करोनाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी रात्रीच्या संचारबंदीचं समर्थन केलं. रात्रीची संचारबंदी म्हणण्या ऐवजी करोना संचारबंदी असे नाव दिल्याने नागरिकांमध्ये जागरूकता वाढेल. जगभरात रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय स्वीकारण्यात आला आहे. यामुळे आपल्याला रात्रीच्या संचारबंदीला करोना संचारबंदीच्या नावाने लक्षात ठेवले पाहिजे, असं मोदी म्हणाले.
करोना रात्रीच येतो का?
काही तज्ज्ञांकडून रात्रीच्या संचारबंदीवर प्रश्न उपस्थित केले जातात. करोना काय रात्रीच येतो का? असा सवाल केला जातो. पण जगभरात रात्रीच्या संचारबंदीचा प्रयोग स्वीकारण्यात आला आहे. कारण प्रत्येकाला रात्रीच्या संचारबंदीमुळे हे लक्षात येते की आपण करोनाच्या संकटात आहोत आणि इतर व्यवस्थांवर यामुळे कमी ताण पडतो. रात्रीची संचारबंदी ही रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ठेवणं अधिक उपयुक्त ठरेल. यामुळे इतर व्यवस्थांवर कुठलाही परिणाम होणार नाही आणि रात्रीची संचारबंदी ही करोना संचारबंदीच्या नावाने ओळखली गेली पाहिजे. हा शब्द नागरिकांना एकजूट करण्यास कामी येतोय, असं म्हणाले.
संपूर्ण लॉकडाउनची स्थिती नाही
पंतप्रधान मोदींचा रात्रीच्या संचारबंदीचं समर्थन करणं हे नागरिकांच्या दिवसाच्या कामावर कुठलाही विपरीत परिणाम होऊ नये या उद्देशाने आहे. यासोबतच सध्या संपूर्ण लॉकडाउनची स्थिती नाहीए. पण औषधोपचारासह आता कडक निर्बंधांचीही गरज आहे, असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं.
देशात करोनाची दुसरी लाट भयंकर स्वरूप घेत आहे. आता रोज १ लाखांवर नवीन रुग्ण देशात आढळून येत आहेत. यामुळे देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ९ लाखावंर गेली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times